मुंबई : मुंबईत २०२२ नंतर परप्रांतीयांची संख्या वाढत चालली असून परप्रांतीयांच्या दादागिरीखाली मराठी माणूस दबत चालला आहे, असे मत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. मराठी माणसाने आपल्याला घाबरून राहावे अशी परप्रांतीयांची दादागिरी कल्याण, डोंबिवली, भांडूप अशा ठिकाणच्या विविध घटनांमधून दिसू लागली आहे. त्यामुळे परप्रांतीयांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आता मराठी माणसाला ताकद देण्याची गरज आहे. त्याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही मत पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावे या बाबतची चर्चा थोड्याथोड्या कालावधीनंतर पुन्हापुन्हा होत असते. तशी ती आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने वातावरण निर्मिती या निमित्ताने सुरू झाली आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या दोन भावांच्या एकत्र येण्याची गरज असल्याचे दावे केले जात आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाच्या रागाची धार आता बोथट झाली असून या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आता मनोमिलनासाठी आतुर झाले आहेत. यानिमित्ताने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही प्रसारमाध्यमांकडे आपले मत व्यक्त केले आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईत परप्रांतीय लोक नोकरी व्यवसायासाठी येतात. आम्ही सहिष्णू आहोत. त्यामुळे पोटापाण्यासाठी धंदा करणाऱ्या कोणा परप्रांतीय व्यक्तीला हाकलून लावत नाही. पण आता हेच परप्रांतीय लोक मराठी माणसाच्या डोक्यावर बसू लागले आहेत. गेल्या दोन वर्षात या परप्रांतीयांची दादागिरी प्रचंड वाढली आहे, असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

मागे वळून बघितले तर सगळा चिखलच दिसेल….

परप्रांतीयांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आता दोन्ही भावांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दोघांच्या राजकीय भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे मनोमिलन आवश्यक आहे. आम्ही सगळे सकारात्मक आहोत असेही सूचन वक्तव्य त्यांनी केले आहे. आता मागे वळून बघायचे नाही, किती मागे वळून बघितले तर सगळा चिखलच दिसेल. त्यामुळे भविष्याचा विचार करून आता निर्णय घ्यावा लागेल असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे यांच्या पक्षात गळचेपी होतेय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रचंड गळचेपी सुरू असल्याचा आरोपही पेडणेकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून तो स्वतःचा पक्ष म्हणून घेतायत. त्यांचे एक नेते आता काय सांगतायत ते लक्षात घ्या. त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेली एक विभाग प्रमुख महिला काय सांगते ते लक्षात घ्या. त्यांच्या पक्षात काय चालले आहे त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही पण तिकडे प्रचंड गळचेपी सुरू आहे, असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. मात्र शिंदे हे देखील शिवसेनेत परत आले तर त्यांचे स्वागत कराल का या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.