मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या तुफान पावसाने व त्यानंतर सुरूच असलेल्य पावसाने सर्वत्रच पाणीच पाणी केले आहे. आता मुंबईची अक्षरशा तुंबई झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश भागामधील रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना घर सोडावं लागल्याचंही समोर आलं आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये तर दुचाकी वाहनं रस्त्यावरील पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. अशाचप्रकारे कांदिवली भागातील ठाकूर कॉम्प्लेक्समधील मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये पावसाचं पाणी मोठ्याप्रमाणावर साचल्याचं समोर आलं आहे. शिवाय जवळपास ४०० वाहनं या पाण्याखाली गेली असल्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. ठाण्यात चेंबूरची पुनरावृत्ती! घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू पाण्याखाली गेलेल्या बीएमसीच्या या पे अँड पार्किंगमध्ये मोठ्यासंख्येने वाहनं लावण्यात आली होती. मात्र सध्या हा भाग पूर्णत: पाण्याखाली गेलेला असल्याने, त्या ठिकाणी असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाकडून या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. वाहन चालकांकडून बीएमसीकडे नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. तर, भाजपा व मनसेच्या स्थानिक नेते मंडळींनी देखील हा मुद्दा उचलून धरला असून, बीएमसीने वाहनांच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी असे म्हटले आहे.