मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले. या दीपोत्सवात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. प्रसिद्ध पटकथा लेखक जावेद अख्तर, सलीम आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासह मराठीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी जावेद अख्तर यांनी केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.

जावेद अख्तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणाले की, काही लोक हैराण असतील की राज ठाकरेंना जावेद अख्तरांशिवाय दुसरं कोणी भेटलं नाही का? जावेद स्वतःला नास्तिक समजतात मग धार्मिक सणांत काय करतायत? याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे ते आमचे चांगले मित्र आहेत. आणि दुसरं म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या शत्रूंना तरी आमंत्रण दिलं तर कोणी नकार तर नाही देणार.

“श्री राम चंद्र आणि सीता फक्त हिंदूंचे देवता नाहीत. जो स्वतःला हिंदुस्तानी समजतो त्या प्रत्येकासाठी रामायण सांस्कृतिक वारसा आहे”, असंही जावेद अख्तर म्हणाले. “ज्याला रामायण आणि महाभारताविषयी माहिती नसेल तो हिंदुस्तानी कसा असेल? रामायण, महाभारत हा इतिहास. काहींची यावर धार्मिक आस्था आहे. आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्वाची बाब आहे की माझा जन्म त्या देशात झाला जो रामचंद्र आणि सीताचा देश आहे”, असंही ते म्हणाले. ते असं म्हणताच जनतेतून श्रीरामाचा जल्लोष झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. संपूर्ण पार्कात रोषणाई करून सेल्फी पॉईंट उभारले जातात. संपूर्ण मुंबई या दीपोत्सवाला हजेरी लावते. तरुणाईंचा जल्लोष येथे दिसतो. यंदाचे हे ११ वे वर्ष आहे.