वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फलक मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्याने तांत्रिक बिघाड होऊन कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. शहाड–आंबिवलीदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे रात्री ९.३० वाजल्यापासून कल्याण-कसारा वाहतूक पूर्णपणे बंद आहे. परिणामी अनेक एक्स्प्रेस गाड्या रखडल्या आहेत.

दिवाळीच्या सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांचा यामुळे हिरमोड झाला आहे. अनेक प्रवासी कामाहून घरी परतत असताना वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अजूनही हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झालेला नसल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे.

मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे आणि कल्याण परिसरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु असल्याने शहाड-आंबिवली रेल्वेस्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरजवळ लावण्यात आलेला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा एक फलक रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वायरवर पडला. त्यामुळे यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मुंबई-नागपूर दूरांतो एक्स्प्रेस, मुंबई-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस, टिटवाळा लोकल आणि आसनगाव लोकल रखडल्या आहेत.