मुंबई : गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६००  रुपयांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या (एनडीआरएफ) निकषाच्या दुप्पट ही मदत असून, राज्यातील सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्राला या निर्णयाचा लाभ होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यात गेल्या दोन महिन्यांत विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला देण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांच्या डोळय़ांत धूळफेक : अजित पवार</strong>

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषाच्या दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा आणि शेतकऱ्यांच्या डोळय़ांत धूळफेक करणारा असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार आणि बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करून सरकारने अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे, त्यांना अधिक गाळात घालण्याचे काम केले, अशी टीका त्यांनी केली़ 

पंचगंगा धोकापातळीच्या दिशेने

कोल्हापूर : पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणाचे ४ दरवाजे आज उघडण्यात आले. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्याचे बुधवारी जाहीर केले.

कोयना, चांदोली, राधानगरी धरणसाठय़ात वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगली : पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला, तरी अद्याप पाण्याची आवक मोठी असल्याने कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून वारणा नदी या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. दरम्यान कोयना, चांदोली आणि राधानगरी या तीनही धरणांतील पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे.