मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय पदाधिकाऱ्याची निवड करणे गैर नाही, मात्र अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीने राजकीय पदाचा त्याग करायला हवा, तरच आयोगाचा अध्यक्ष पक्षनिरपेक्ष काम करेल, असा सूर राज्य महिला आयोगाची कार्यपद्धती व क्षमतावृद्धी यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत उमटला.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला चळवळीत काम करणाऱ्या संस्था, महिला आणि आयोगाच्या आजी-माजी अध्यक्ष व सदस्यांची मंगळवारी विधान मंडळात बैठक बोलावली होती. बैठकीत आयोगाच्या प्रभारी सचिवांनी कामकाजाचे सादरीकरण केले. आतापर्यंत ९९० हून अधिक संदेश ‘हेल्पलाईन’वर प्राप्त झाले आहेत. वर्षाला सरासरी ९ हजारी महिलांच्या तक्रारी आयोगाला प्राप्त होतात. समुपदेशकांची कमतरता असून पुरेसा निधी नाही. कार्यालयासाठीची अपुरी जागा आहे, असे मुद्दे या वेळी मांडण्यात आले. दरम्यान, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मिळवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. तसेच मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
आयोगाच्या कार्याचा वेग वाढवण्यासाठी अधिक अधिकार, अधिक निधी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणे आवश्यक आहे. आयोगाच्या कामकाजात ‘एमएसडब्ल्यू’ पदवीधरांची अधिक प्रभावी भूमिका असावी, त्यांचे मानधन वाढवावे. – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
…तरच आयोगाला गांभीर्य
घरगुती हिंसाचाराचे खटले वर्षानुवर्षे रेंगाळत राहतात. म्हणून, पीडितेला अंतरिम पोटगी तत्काळ देण्यासंदर्भातला नियम करण्यासाठी आयोगाने पाठपुरावा करावा. बालहक्क व मानवी हक्क आयोगासमोर आरोपी व्यक्तीला हजर होण्याचे बंधन आहे, तशी तरतूद महिला आयोगाने करावी. तरच आयोगाला गांभीर्याने घेतले जाईल, अशी सूचना आयोगाच्या माजी अध्यक्षा निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी केली. विदर्भातल्या महिला चळवळीतील एकीसही या बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचा आरोप आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपसभापती गोऱ्हे यांच्यावर केला.
चाकणकरांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
भाजपच्या चित्रा वाघ यांनी आयोगाच्या प्रशासकीय उणीवांवर बोट ठेवले. माजी सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी आयोग चाकोरीबद्ध काम करत असून विद्यमान अध्यक्षांच्या कार्यपद्धीवर नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शाह आदींनी आयोगाच्या कामकाज सुधारण्याबाबत सूचना मांडल्या.
आपण विनाकारण लक्ष्य : चाकणकर
आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विविध योजनांची माहिती दिली. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आणि मयुरी हगवणे यांच्यावरील अत्याचारासंदर्भात नोंदलेल्या गुन्ह्याचा सविस्तर घटनाक्रम सांगतिला. हगवणेप्रकरणी माध्यमांनी आपल्याला विनाकारण लक्ष्य केले आहे. तसेच विरोधकांनी आयोगावर टीका करताना मर्यादा ओलांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.