मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाविराेधात महाविकास आघाडीकडून उद्या राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या नावाखाली विरोधी पक्षाचा आवाज दडपण्यासाठीच हे विधेयक मंजूर करण्यात आले, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.

या विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, माकप, भाकप, शेकाप यांच्यासह अन्य समविचारी पक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहेत. उद्या राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भीती आहे. नक्षलवादाविरोधात सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत. त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही. या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, तुरुंगात टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली आहे. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.