मालाड-मालवणीमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने १०० पेक्षा जास्त बळी गेल्यानंतर काँग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले असले तरी काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख या दुर्घटनेनंतर मतदारसंघात अजिबात फिरकलेले नाहीत. शेख नक्की आहेत तरी कुठे, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.
मालाडच्या दुर्घटनेवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोषींच्या विरोधात ‘मोक्का’ अन्वये कारवाई करावी, या मागणीसाठी निरुपम यांनी मोर्चा काढला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिसराचा दौरा केला. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. तसेच शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. शेख यांच्या पक्षाचे विधिमंडळ नेते मतदारसंघात आले तरी स्थानिक काँग्रेस आमदार मात्र उपस्थित नव्हते. मतदारसंघात एवढी भीषण दुर्घटना घडलेली असताना आमदार अस्लम शेख कोठे गायब झाले, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
अस्लम शेख हे हज यात्रेला गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, आमदार शेख हे अमेरिकेत गेल्याची चर्चा आहे. या दुर्घटनेनंतर आमदार शेख मालवणीकडे फिरकलेच नव्हते, अशी कबुली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. गेल्या आठवडय़ात ही दुर्घटना घडली त्याच्या दोन दिवस आधीच आमदार शेख हे हज यात्रेला रवाना झाले. दुर्घटनेची माहिती समजताच आपण सौदी अरेबियातून मुंबईत परतत आहोत, असे त्यांनी मला दूरध्वनीवरून कळविले, पण यात्रा पूर्ण करून मगच परतावे, अशी सूचना मीच त्यांना केली असे निरुपम म्हणाले. दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने अस्लम शेख यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.