मुंबई : ‘ऑनलाईन रेटींग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा’ या फसव्या जाहिरातीला बळी पडून ओशिवरा येथील एका तरुणाने ३ दिवसांत ६ लाख रुपये गमावले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. घरबसल्या ऑनलाईन रेटींग द्या आणि पैसे कमवा असा दावा करून नागरिकांची फसवणूक करण्याचा जुना प्रकार आहे. मात्र आजही नागरिक अशा भूलथापांना बळी पडत आहेत. जोगेश्वरीत राहणाऱ्या तरुणाची अशाच प्रकारे ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका चपलांच्या शो रूममध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या मोह्मम्मद नगानीला (३२) टेलिग्रामवर १२ जून २०२५ रोजी विजय नावाच्या एका अनोळखी व्यक्तीचा संदेश आला. तुमच्यासाठी एक काम आहे. तुम्ही मुंबईतील विविध रेस्टॉरंट कशी आहेत त्याबद्दल रेटींग दिल्यास दिवसाला ५ ते ८ हजार रुपये मिळतील, असे आमिष त्याला दाखवण्यात आले. हे काम सोपे असल्याने नगानी त्यासाठी तयार झाला.

अशी केली फसवणूक

सायभर भामट्याने नगानीला काही रेस्टॉरंटची नावे दिली. त्यावर रेंटीग करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने रेटींग दिले आणि त्याचे स्क्रीन शॉटस पाठवले. त्यानंतर समोरील व्यक्तीने नगानीच्या बॅंक खात्याची माहिती घेऊन त्यावर १८० रुपये पाठवले. पुढील व्यवहार करण्यासाठी टेलिग्रामवर एक लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यासाठी सांगितली. ती लिंक ओपन केली असता आयुषी त्रिवेदी नामक महिलेने टेलिग्रामवर एनएसई खाते बनविले. त्यावर आधी ४ हजार रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी नगानीने तो प्रक्रियेचा भाग असावा म्हणून ते पैसे भरले. त्याला मिळणारी अधिक रक्कम त्या खात्यावर दिसत होती. त्यामुळे त्याचा विश्वास बसला आणि तो सापळ्यात अडकला.

त्यानंतर भूलथापा मारत त्याला आणखी पैसे भरण्यास सांगितले. आमिषापोटी तो पैसे भरत गेला. तीन दिवसात त्याने तब्बल ६ लाख ९ हजार रुपये भरले. त्यानंतर ती लिंक डिलीट करण्यात आली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे नगानीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या ६६ (क), ६६ (ड), तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३१९ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचे आवाहन

‘रेंटींग द्या आणि पैसे कमवा’ ही सायबर भाटम्यांची जुनी पध्दत आहे. मात्र नागरिक आमिषाला बळी पडत असल्याने ती आजही प्रभावी ठरत आहे, असे पोलिसांनी सांगितले. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंक ओपन करू नये, तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन ओशिवरा पोलिसांनी केले आहे.