मुंबई : लेखकांच्या विविध मागण्यांसाठी मालिका, नाटक व चित्रपट म्हणजेच ‘मानाचि’ लेखक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची नुकतीच भेट घेतली. याप्रसंगी लेखकाला नाटक, चित्रपट व मालिकेच्या शीर्षकाची स्वतःच्या नावाने नोंदणी करण्याची सुविधा ते वृद्ध व दिव्यांग लेखकांसाठी विमा व निवृत्तीवेतन योजना आदी विविध मागण्यांवर चर्चा करून ॲड. शेलार यांना एक निवेदन देण्यात आले.

लेखकाला नाटक, चित्रपट व मालिकेच्या शीर्षकाची स्वतःच्या नावाने नोंदणी करता यावी, एखाद्या रचनेतील शब्द मालिकेचे शीर्षक म्हणून वापरताना लेखकाचा आदरपूर्वक उल्लेख श्रेयनामावलीत केला जावा, लेखक संघटनेला कार्यालय, तसेच अन्य उपक्रम राबविण्यासाठी १०० व्यक्तींना पुरेल इतकी जागा विनामूल्य किंवा कमी भाड्यात उपलब्ध करून द्यावी, लेखक व गीतकाराने पूर्ण मानधन मिळाल्याचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र द्यावे, स्वामित्व हक्क व बौद्धिक संपदा हक्क संदर्भातील नोंदणी प्रक्रियेसाठी दिल्लीसह मुंबईतही व्यवस्था करावी, वृद्ध किंवा दिव्यांग, तसेच काम करू न शकणाऱ्या लेखकांसाठी समूह विमा व निवृत्तीवेतन योजना सुरू करावी, या प्रमुख मागण्या ‘मानाचि’ लेखक संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

‘मानाचि’ लेखक संघटनेचे पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक आणि विवेक आपटे या पदाधिकाऱ्यांनी ॲड. आशिष शेलार यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच लेखकांसाठी समूह विमा व निवृत्तीवेतन योजनेसाठी लेखकांची पात्रता पडताळून शासनाला तसे सूचित करण्याची जबाबदारी व अधिकार ‘मानाचि’ लेखक संघटनेला द्यावेत. कारण सदर योजनेत शासनासह निर्माते, कलाकार व प्रेक्षकांचाही सहभाग अपेक्षित आहे, अशी भूमिकाही ‘मानाचि’ लेखक संघटनेने मांडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मानाचि’ लेखक संघटना ही मराठी भाषेतील मालिका नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना आहे. सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी, गीतकार व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी, त्यांना योग्य मानधन मिळण्यासाठी आणि लेखकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ही संघटना कार्य करते.