काँग्रेसला पर्याय देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंतच्या नेतृत्वाने केवळ वापरून घेतले, या पक्षाची वाढ होऊ दिली नाही. शिवसेनेच्या लोकांनी दलितांवर अत्याचार केले नाहीत, परंतु गावागावात वर्चस्व असलेल्या काँग्रेसशी संबंधित धनदांडग्यांनीच दलितांवर सर्वाधिक अत्याचार केले, मराठवाडय़ात नामांतराच्या आंदोलनात दलितांच्याविरोधात काँग्रेसबरोबर समाजवादीही होते, असे आरोप करीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसत्ताच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेससोबतची युती ही चूकच होती, काँग्रेसला विरोध म्हणून आता शिवसेना-भाजपशी आरपीआयने युती केली आहे, मात्र शिवसेना-भाजपचे आरपीआयशी कसे वर्तन राहते, हाही भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, असा एक गर्भित आणि सूचक इशाराही त्यांनी दिला.
बाबासाहेबांच्या पश्चात रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकरी चळवळीची झालेली दयनीय अवस्था, काँग्रेसकडून रिपब्लिकन पक्षाचा झालेला वापर, आंबेडकरी विचारात न बसणाऱ्या शिवसेना-भाजपशी केलेली हातमिळवणी, हिंदुत्व व आरक्षण हे कळीचे मुद्दे असताना महायुतीचे राजकीय भवितव्य काय असणार, गटबाजी संपवून आरपीआयचे पुन्हा कधी तरी ऐक्य होऊ शकते का, अशा विविध प्रश्नांना रामदास आठवले यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीने मला खासदार केले, मंत्री केले, परंतु कार्यकर्त्यांना काही दिले नाही. शिर्डीतही माझा पराभव केला. त्यानंतर आपण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात रिडालोसचा प्रयोग केला. परंतु, त्याला फारसे यश आले नाही. शिवसेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच काँग्रेसने आरपीआयला कायम जवळ केले, पण काँग्रेसने आरपीआयला कधी वाढू दिले नाही. दादासाहेब गायकवाडांपासून ते रा.सू. गवई व मी ही काँग्रेससोबत युती केली, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे मोठे नुकसान झाले, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.
सविस्तर वृत्तांत रविवारच्या अंकात

जे जे ‘आठवले’, ते ते बोलले..
*  महायुतीत हिंदूत्व व रक्षण हे वादाचे मुद्दे
*  राममंदिराला विरोध असण्याचे कारण नाही
*  दलितांमधील सधन वर्गाने आरक्षण घेऊ नये
*  आरपीआयला जातीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न
*  प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी पुढे यावे