वाहतूक कोंडी आणि अल्प प्रवासी प्रतिसादाचे कारण
प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आणि वाहतूक कोंडीचे कारण देत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपले मुंबई सेंट्रल आगार बंद करण्याचे ठरविले आहे. येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाडय़ांच्या फेऱ्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जाणार असून काही फेऱ्या मुंबईतील अन्य आगारांतून सोडण्याचे नियोजन केले जात आहे.
राज्यात २५० आगारे असली तरी वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवासी संख्या कमी होत चालली आहे. कमी प्रवासी आणि वाढता खर्च याची हातमिळवणी करण्यासाठी ज्या एसटी आगारांचे भारमान कमी झाले आहे तेथील बससेवा बंद करण्याचे किंवा अन्य आगारांत वळविण्याचे एसटी महामंडळाने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई सेंट्रलहून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी बस परळ आगारातून तर खानदेश व मराठवाडय़ाकडे जाणाऱ्या बसगाडय़ा कुर्ला नेहरू नगर आगारातून सोडण्याचे नियोजन केले जात आहे.
मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या आणि तेथे जाणाऱ्या बस या लालबाग आणि परिसरातील कोकणवासियांसाठीही सोयीच्या ठरतात. त्या फेऱ्या बंद झाल्या तर तेथे राहाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे. केवळ मोक्याची जमीन विकण्याचा हा डाव तर नाही ना, अशी शंका त्यामुळे व्यक्त होत आहे.
मुंबई सेंट्रल बस आगारातील फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यास राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. एकाच आगारातून एकाच मार्गावर दहा फेऱ्या सुटत असतील आणि त्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असेल तर त्या आम्ही बंद करत आहोत. मुंबई सेंट्रल आगार मुख्यालयाचे नूतनीकरण होणार आहे. अर्थात ते करण्यापूर्वी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ केले जाईल. इमारत चांगल्या अवस्थेत असेल तर नूतनीकरण आणि चांगल्या अवस्थेत नसेल तर ती पाडण्यात येईल.
– रणजितसिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक
वाहतूक पोलिसांची विनंती? सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत दादरच्या पुढे अवजड वाहनाना बंदी आहे. दादरच्या पुढे एसटी गाडय़ा मोठय़ा संख्येने येत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडूनही दादरच्या पुढे एसटी बसेस आणू नयेत, असे सांगण्यात आले आहे.
वर्दळ घटली..
- मुंबई सेंट्रल बस आगारातून दिवसाला एक हजार गाडय़ा सुटायच्या आणि यायच्या. आता हीच संख्या साडेसातशेपर्यंत आली आहे.
- राज्यभरातील सुमारे शंभरहून बस आगारातून मुंबई सेंट्रल बस आगारात बस येत. ती संख्या आता पन्नासवर. यात लांबून येणाऱ्या गाडय़ांची संख्या जास्त.