मुंबई : अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी ७ जून रोजी १२.३० वाजेपर्यंत मुदत दिली असताना शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी सायंकाळी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. या यादीमध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २४१ आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये काही तक्रार असल्यास विद्यार्थ्यांना ७ जूनपासून लॉगिनवरून शिक्षण संचालनालयाकडे तक्रार करता येणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग २ भरण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांपासून ७ जून रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानुसार विद्यार्थी भाग २ भरत असताना शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी सायंकाळी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. या यादीमध्ये ४०० ते ५०० पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २२ हजार ४४३ इतकी आहे. यामध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २४१ इतकी आहे. तर ४९९ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ इतकी आहे.
४९८ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ इतकी आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये कट ऑफ वरचढ असल्याचे पाहायला मिळणार असून, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस सुरू आहे. अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये काही सुधारणा असल्यास विद्यार्थ्यांना तक्रार नोंदविता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवरून ७ जूनपासून तक्रारी नोंदविता येणार आहे.