मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा कमी होऊ लागल्याने आणि धरणक्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याने आज, सोमवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ालाही ही कपात लागू असेल. जलसाठय़ात पुरेशी वाढ होईपर्यंत पाणीकपात करण्यात येणार असल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. गेल्या वर्षी धरणक्षेत्रांत चांगला पाऊस पडला होता, परंतु मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या केवळ ९.३४ टक्के साठा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा उत्तम होता. मात्र यंदा अद्याप दमदार पाऊस न झाल्यामुळे साठा खालावला आहे. जून संपत आला तरी धरणक्षेत्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली. एप्रिलच्या सुरुवातीला ४० टक्के असलेला पाणीसाठा आता जेमतेम ९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणांतील साठय़ात वाढ होण्याइतका पाऊस पडेपर्यंत, सध्याच्या पाणीसाठय़ावर मुंबईकरांना अवलंबून राहावे लागेल. जलसाठा कमीच.. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ३५ हजार १५६ दशलक्ष लिटर म्हणजे ९.३४ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा जलसाठा १६.२५ टक्के इतका होता. तुलनात्मक जलसाठा २६ जून २०२२ : १ लाख ३५ हजार १५६ दशलक्ष लिटर- ९.३४ टक्के २६ जून २०२१ : २ लाख ३५ हजार १४१ दशलक्ष लिटर- १६.२५ टक्के २६ जून २०२० : १ लाख ३५ हजार ८२६ दशलक्ष लिटर- ९ ३८ टक्के कपातीचे कारण.. जलाशयांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत कसा पुरेल यादृष्टीने पालिकेचा जल अभियंता विभाग नियोजन करतो. १ ऑक्टोबरला सर्व जलाशय पूर्ण भरलेले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. ते भरले नाहीत, तर पाणीकपातीची वेळ येते. दमदार पाऊस झाला नाही तर पाणीसंकट गंभीर होऊ शकते. ते टाळण्यासाठी दहा टक्के पाणीकपात लागू करणे आवश्यक ठरते. यापूर्वी.. २०२०च्या जुलैमध्ये पाणीसाठा वाढत नसल्यामुळे ऑगस्टमध्ये २० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर पाणीकपात १० टक्क्यांवर आणली गेली. २०१८ मध्ये पाणीसाठय़ात ९ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के पाणी कपात करण्यात आली होती.