दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा आणि तुलसी धरणात १०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सातही तलावांतील पाणीसाठा ९२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या आठ दिवसात १ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांत सध्या ९२.६२ टक्के पाणीसाठा आहे. सातही तलावांमध्ये मिळून सध्या १३ लाख ४० हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणीपातळी वाढत नव्हती. बुधवारपासून पावसाने पुन्हा एकदा ताल धरला आणि तलावांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा खूपच जास्त आहे. तलावांतील पाणीसाठयात आता केवळ ८ टक्के तूट आहे.

पाणी पातळीतील ८ टक्के तूट भरून निघेल –

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही तलावांची पाणी साठवण्याची क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबर मध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. या वेळी तलाव पूर्ण क्षमतेने भरली असल्यास पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही. येत्या काळात मुसळधार पाऊस पडल्यानंतर पाणी पातळीतील ८ टक्के तूट भरून निघेल अशी अपेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या चोवीस तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक ५७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर शहर भागात ३१.४९ मि.मी., पूर्व उपनगरात ४९.६१ मि.मी. पाऊस पडला.

तीन वर्षांत ८ ऑगस्टपर्यंतचा जलसाठा –

वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) – टक्केवारी

२०२२ – १३,४०,५०८ – ९२.६२ टक्के

२०२१ – ११,६४,२०१ – ८०.४४ टक्के

२०२० – ७,०८,१७५ – ४८.९३ टक्के