मुंबई : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथ आणि पाठिंबा सर्वांसाठीच महत्त्वाचा असतो. तर वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणे अवघडच आहे. या सुंदर नात्यावर आधारित ‘का रे बाबा’ हे गीत १२ जूनपासून भेटीस येत आहे. हे गीत ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने गात वडिलांना साद घातली आहे. येत्या १५ जून रोजी आंतरराष्ट्रीय पितृ दिनाच्या पार्श्वभूमीवर हे गीत खास ठरणार आहे. ‘अवकारीका’ चित्रपट येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

का रे बाबा. . . का रे पप्पा, कुठे हरवल्या तुझ्या छान छान गप्पा, तू सांग ना तू सांग ना तू सांग ना….हा माझ्या बाबा, असे बोल असलेले हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिले असून श्रेयस देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘बाप लेकीचे भावनिक नाते उलगडणारे ‘अवकारीका’ चित्रपटामधील हृदयस्पर्शी गाणे आपल्या आयुष्यात असलेले वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट या सर्वांची जाणीव करून देते. येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पितृ दिनाच्या निमित्ताने हे गीत वडील मुलीच्या नात्यासाठी सुंदर भेट ठरेल. हे गीत गाताना खूप मजा आली. हे गाणे प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा ठाव घेईल’ , असा विश्वास गायिका सुनिधी चौहान हिने व्यक्त केला.

रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’ चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे. तर अभिनेता विराट मडके ‘अवकारीका’ चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुंबकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे, तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे आदी कलाकार मंडळी दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छायांकन करण तांदळे, तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. श्रेयस देशपांडे यांचे संगीत असून गायक कैलास खैर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत. आयुष्याच्या प्रवासात स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधण्यासाठी अनेकजण अहोरात्र मेहनत करीत असतात. अनेक जण सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कसून काम करीत असतात. समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.