मुंबई : ऑक्टोबरच्या उष्णतेचा तडाखा आणि उकाडय़ाने त्रासलेल्या मुंबईत हवेचाही दर्जा घसरला आहे. मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब असून, पालिकेने मुखपट्टय़ा वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. ठाणे, नवी मुंबईतील हवाही खराब झाली असून, संपूर्ण मुंबई महानगराचा श्वास कोंडल्याचे चित्र आहे.मुंबईतील अनेक भागांतील हवा अतिवाईट असल्याची नोंद बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी करण्यात आली. विलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची स्थिती बुधवारी सायंकाळी अतिधोकादायक असल्याची नोंद झाली. हवेत साचलेले धुलीकण आणि धुके यामुळे मुंबईत धुरके पसरत असल्याचे दिसते. अनेक भागांत सकाळी आणि सायंकाळी हवेतील धुळीमुळे दृष्यमानताही कमी झाली आहे. मुंबईची हवा बिघडल्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले असून, हवेचे प्रदूषण, धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. विभाग कार्यालयांमध्ये यापूर्वी तयार करण्यात आलेली कृती दलाची पथके येत्या आठवडय़ापासून पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पालिका प्रशासनाच्या धर्तीवर प्रदूषणाबाबत बैठकांचे सत्र सुरू असून, सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजारांच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा मुखपट्टी वापरण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे. हेही वाचा >>>‘भोसला’ला आणखी जमीन? नागपुरात वाढीव जागा देण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णयाची शक्यता पालिकेचा ‘स्मॉग गन’चा प्रयोग बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ रोखण्यासाठी विकासकांना खबरदारीच्या नोटीसा पाठवण्यात येणार आहेत. तसेच मुंबईत विविध ठिकाणी पाण्याचा मारा करणारी ३० स्मॉग गन फॉिगग मशीन विकत घेण्यात येणार आहेत. मुंबईसाठी अशी ३० यंत्रे खरेदी करण्यात येणार असून घनकचरा विभागामार्फत त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाहनारूढ अशी ही यंत्रे यायला दोन -अडीच महिने लागतील. या यंत्रांच्या माध्यमातून पाण्याचा फवारा मारता येतो. त्यामुळे धुळीचे कण जमिनीवर बसतात. विकासकांना ताकीद विकासकांनी आपल्या खर्चाने अशा मशीन घेऊन त्याद्वारे बांधकामाच्या ठिकाणी फवारे मारावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच बांधकाम क्षेत्राच्या आजूबाजूला २२ मीटर उंचीपर्यंत जे पत्रे उभे केले जातात त्याची उंची ३० मीटपर्यंत करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. लादी कापणे, राडारोडा गोळा करणे, अशा कामांमध्येही पाण्याचे फवारे मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठाणे शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १४१ इतका असून, तो मध्यम प्रदूषित गटात मोडतो. मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये प्रदूषणात वाढ झाली असेल तर पुढील काही दिवस शहरातील हवा गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येईल. त्यात हवा प्रदूषित आढळली तर मुखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यासारख्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली. हेही वाचा >>>सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन मृत्यू प्रकरण : आदित्य ठाकरेंची उच्च न्यायालयात धाव आरोग्यावर परिणाम तापमानातील बदलांबरोबरच वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, लहान मुलांसह वृद्धांना सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास सुरू झाल्याचे दिसून येत आहे. श्वसन आजार असणाऱ्या रुग्णांचा त्रास वाढण्याची शक्यता असल्याचे जे. जे. रुग्णालयातील क्षयरोग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोहित हेगडे यांनी सांगितले. धुरक्यांचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत असतो. धुरक्यामुळे लहान मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दमा, अस्थमा यासारखे श्वसनाचा आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यात अधिक त्रास होतो. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे ठरलेले लसीकरण केल्यास त्यांना त्रास कमी होण्याची शक्यता इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिन मुंबई विभागाचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले. साथीच्या आजारांचे सावट प्रदूषणाबरोबरच हवामानातील बदलांमुळे फ्लू आणि फ्लूसदृश रुग्णवाढ होण्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली. स्वाईन फ्लूच्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरा दिवसात स्वाईन फ्लूचे ३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. हेही वाचा >>>“शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेतही आहेत आणि विरोधातही जगात कुठे अशी…”, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बोचरी टीका स्थिती काय? नवी मुंबई, उरण परिसरात हवेचा दर्जा बुधवारी अतिवाईट नोंदविण्यात आला. ठाणे शहर सध्या मध्यम प्रदूषित गटात असले तरी प्रदूषण वाढल्यास तिथेही मुखपट्टी वापराबरोबरच इतर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तापमानातील बदलांबरोबरच वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, श्वसनाच्या त्रासाबाबत तक्रारींत वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्लीपेक्षाही मुंबईची स्थिती बिकट होत चालली आहे. मुंबईतील विकासकामे आणि त्यामुळे होणारी प्रदूषण ही चिंतेची बाब आहे. त्यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणात विकासकामे, पुनर्विकास कामे सुरू आहेत. पण त्यांच्यावर मर्यादा नाहीत आणि त्यांच्याकडून कोणत्याही नियमाचे पालन होत नाही. - भगवान केसभट,संस्थापक, वातावरण संस्था मेट्रो प्रकल्पांसह सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबईत हवा प्रदूषण वाढलेले आहे. हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘स्मॉग गन फॉिगग मशीन्स’ घेण्यात येणार आहेत. -दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई शहर