मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी, असेही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

राज्य रस्ते विकास मंडळाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.

मुंबई – नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावा, या मार्गावरील ३१ किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहे, तसेच पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावी, कंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी असेही सांगितले.येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले. गेली तीन वर्षे पावसाळ्यात मुंबई – नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होते. तासनतास वाहने वाहतूक कोंडीत अडकतात. वाहतूक कोंडी होता कामा नये, असेही शिंदे यांनी बजाविले.

कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी अशी सूचना शिंदे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्ग १० मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरीत्या पूर्ण करावे असे सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहाऐवजी १० मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव रस्ते विकास मंडळाच्या विचाराधीन आहे. या कामासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चार ठिकाणी नव्याने बोगदे तयार करावे लागणार आहेत.