मुंबई : सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या लघु उदंचन केंद्र परिचालकांनी निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याने तसेच पुरेशा क्षमतेने कार्यान्वित केली नसल्याने त्यांच्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी लघु उदंचन केंद्र येथील परिचालकांना प्रत्येकी १० लाख रूपये म्हणजेच एकूण ४० लाख रूपये दंड ठोठावला आहे.
नागरी भागात पावसाचे पाणी साचू नये, सखल भागांमध्ये साचणारे पावसाचे पाणी उपसून वाहून नेता यावे, पर्यायाने रस्ते वाहतूक सुरळीत राहावी तसेच पावसाळी पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी १० ठिकाणी लघु उदंचन केंद्र स्थापली आहेत. त्या केंद्रांचे परिचालन कंत्राटदारामार्फत केले जाते. त्यासाठी निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीही ठरवून देण्यात आल्या आहेत. तसेच, २५ मे २०२५ पर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले होते.
मुंबईत सोमवार, २६ मे रोजी मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या १३ तासांमध्ये २५० मिलीमीटर पावसाची नोंद अनेक ठिकाणी झाली. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कार्यक्षेत्रावर कार्यरत होती. असे असले तरीही हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथे अतिसखल भागात जोरदार पावसाने पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी नेमलेली लघू उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने व वेळेत कार्यान्वित झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हिंदमाता व गांधी मार्केट या परिसरातील वाहतूक सेवा व जनजीवन विस्कळीत झाले. तसेच, मस्जिद उपनगरीय रेल्वे स्थानक परिसरांमध्ये काही मिनिटे पाणी साचून उपनगरीय रेल्वेच्या संचालनात देखील अडथळा उद्भवला. चुनाभट्टी येथे फारसा पाऊस झाला नसला तरी तेथील पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हते. या सर्व समस्यांची गंभीर दखल घेऊन परिचालकांना दंड आकारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथील लघु उदंचन केंद्र परिचालकांना निविदा अटी व शर्तीप्रमाणे, पुरेशा कार्यक्षमतेने यंत्रणा कार्यरत नसल्याने दंडात्मक कारवाई केली. त्यानुसार, प्रत्येकी १० लाख रूपये याप्रमाणे एकूण ४० लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पावसाळी नियोजनानुसार, नेमून दिलेल्या कामकाजात, कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.