-संदीप आचार्य दिव्यांग मुलांच्या विविध आजारांवर एकाच छताखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैद्यकीय उपचार देणारे ‘अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर’ महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या माध्यमातून लवकरच नागपाडा येथील ओशनबिझ या इमारतीमध्ये सुरु करण्यात येत आहे. दिव्यांग मुलांच्या विविध समस्या असतात तसेच त्यांच्या पालकांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. दिव्यांग मुलांचे आजार हाताळणे हे विशेष कौषल्याची बाब असून अशा मुलांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी त्यांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी नायर रुग्णालयांअतर्गत नागपाडा येथील ओशनबिझ या इमारतीत अर्ली इंटरव्हेन्श्न सेंटर उभारण्यात येत आहे. पाच मजली इमारतीत दिव्यांग मुलांसाठी एकाच छताखाली बालरोग चिकित्सा, मनोविकृती शास्त्र, व्यवसायोपचारशास्त्र, भौतिकोपचार शास्त्र, श्रवण व वाक् विकृती शास्त्र, कान-नाक-घसा उपचार, अस्थिव्यंगोपचार, दंतरोग शास्त्र अशा विविध विभागाशी संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रवीण राठी यांनी सांगितले. डॉ. हिनल शहा. डॉ. सुरभी राठी यांच्यासह विविध विभागाच्या प्रमुखांच्या प्रयत्नांमधून या अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरची संकल्पना आकाराला आली आहे. दिव्यांग मुलांच्या विविध आजारांवर एकाच छताखाली अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय सेवा देणारे मुंबई महापालिकेचे हे पहिलेच केंद्र असून मुलांबरोबरच पालकांच्या मानसिक स्थितीचा विचारही यात केला जाणार आहे. दिव्यांग मुले जससशी मोठी होत जातात तसतसे या मुलांची अधिकची काळजी घ्यावी लागते तसेच वैद्यकीय चाचण्या व औषधोपचारावरील खर्चाचा विचार करून महापालिकेने या सर्व सेवा मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. गतिमंद, स्वमग्न, अध्यायन क्षमता कमी असलेली मुले, स्नायुंची विकृती, सेलेब्रल पाल्सी आदी विविध प्रकारच्या दिव्यांग मुलांची येथे काटेकोरपणे काळजी घेतली जाणार असून १९ वयोगटापर्यंतच्या मुलांवर येथे उपचार केले जातील असे डॉ. प्रवीण राठी यांनी सांगितले. नायर रुग्णालयाच्या नागपाडा येथील ओशनबिझ या इमारतीत हे केंद्र चालविण्यात येणार असून तळमजला अधिक पाच मजले जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास ३५ हजार चौरस फूट जागेत या लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध दालने तयार करण्यात आली आहेत. लहान मुलांशी संबंधित सर्व विभागांचे डॉक्टर येथे उपलब्ध राहाणार असून याठिकाणी मुलांमधील पाच प्रकारच्या कौशल्य विकासावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात शारीरिक कौशल्य, संज्ञानात्मक कौशल्य, संप्रेषण वा भाषा विषयक कौशल्य, स्वमदत, सामाजिक व भावनिक कौशल्याच्या विकासावर भर दिला जाणार असून महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल व अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी हा प्रकल्पासाठी विशेषत्वाने पाठपुरवा केल्याचे डॉ. राठी यांनी सांगितले. युनोस्कोच्या २०११च्या एका अहवालानुसार भारतात ७८ लाख ६४ हजार ६३६ दिव्यांग मुलांची संख्या असून यातील यातील शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही ग्रामीण भागात शाळेत न जाणऱ्या मुलांची संख्या शहरी भागाच्या तुलनेत खूप जास्त आहे. या पार्श्वभूमीवर या मुलांचा सर्वांगिण विकास तसेच पालकांना मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने आगामी काळात काही भरीव योजना राबविण्याचा मानस डॉ. राठी यांनी व्यक्त केला.