काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे की, “बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका.” शास्त्री यांचा कार्यक्रम १८ आणि १९ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

पत्रात पटोले यांनी लिहिलं आहे की, “महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांसाठी या राज्यात जागा नाही. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला राज्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये.”

हे ही वाचा >> “मला माफ करा योगीजी”, एन्काऊंटरच्या भीतीने बाइकचोर हातात पोस्टर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल

अमोल मिटकरींकडून विरोध

याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता पटोले म्हणाले की, “बागेश्वरसारख्या मानसिकतेच्या लोकांना सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकार स्वतःच अशा लोकांना पाठिंबा देऊन राज्यातलं वातावरण बिघडवत असेल तर ही गोष्ट राज्यासाठी चांगली नाही.” तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, “आम्ही विधान परिषदेत मागणी केली होती की, या बागेश्वर बाबावर कडक कारवाई केली जावी. अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या या बाबाला राज्यात कार्यक्रमासाठी परवानगी मिळत असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईजवळच्या मीरा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.