अमृता फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय. “मी महिलांवर आरोप केल्याचं म्हटलं जातंय. पण गेल्या २५ दिवसांत मी दोन महिलांशिवाय इतर कुणाचंही नाव घेतलेलं नाही. ज्या दोन महिलांचं नाव घेतलंय त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे म्हणूनच उल्लेख केलाय. दुसऱ्यांच्या आया-बहिणी महिला नाहीत का, असा सवाल त्यांनी आरोप करणाऱ्यांवर केला. किरीट सोमय्यांनी काल अजित पवारांच्या आईचा बहिणीचा उल्लेख केला. यापूर्वी एकनाथ खडसे आणि संजय राऊतांच्या पत्नीबद्दल भाजपाच्या नेत्यांनी विधानं केली, त्याचं काय,” असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मी कुणावरही हवेत आरोप केलेले नाही, असं मलिक यांनी म्हटलं.

“देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप केलेत. त्यांनी माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केल्याचं सांगितलं. मात्र माझ्या जावयाच्या घरातून कोणताही आपत्तीजनक वस्तू सापडली नाही, यासंदर्भात तुम्ही तुमचे निकटवर्तीय समीर वानखेडे यांनाही विचारू शकता,” असं नवाब मलिक म्हणाले. “६२ वर्ष या मुंबईत घालवली, कुणीतरी येऊन सांगावं की माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,” असं आवाहन नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना केलं. तसेच “माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडे होतं, त्यावेळी त्यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित करत मी एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याने माजी मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत,” असंही ते म्हणाले.