आगामी लोकसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, रायगडमधून जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनाही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्वाच्या मनात असलेल्या काही जणांची मात्र, लोकसभा लढविण्यास नकारघंटा आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडक नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसला सुटू शकतात, अशा जागांवरील नावे पक्षाने निश्चित केलेली नाहीत. परंतु या जागांवरील नावांबाबत विचार झाल्याचे समजते. नाशिकमध्ये विद्यमान खासदार समीर भुजबळ यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचे नाव निश्चित करण्यात आले. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी जयदत्त क्षीरसागर किंवा सुरेश धस या दोन मंत्र्यांपैकी एकाला रिंगणात उतरविले जाणार असले तरी धस यांचेच नाव पुढे आहे.
रायगडची जागा लढण्यास काँग्रेस फारशी उत्सुक नाही. जागावाटपात ही जागा सुटल्यास सुनील तटकरे यांना उभे करण्याचे पवार यांच्या मनात आहे. मात्र स्वत: तटकरे लोकसभा लढण्यास फारसे उत्सुक नाहीत. आपल्या मुलीला उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे. शिरुरमध्ये वल्लभशेठ बेनके यांनी लढावे, असा प्रस्ताव असला तरी स्वत: बेनके फारसे उत्सुक नाहीत.
दरम्यान, लोकसभेसाठीच्या उमेदवारांची राष्ट्रवादीची यादी २१ जानेवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता पक्षाच्या एका खासदाराने वृत्तसंस्थेकडे व्यक्त केली. २००९च्या निवडणुकीत पक्षाने २२ जागा लढविल्या होत्या व आठ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत दुप्पट जागांवर विजय होईल, असा विश्वासही या नेत्याने व्यक्त केला.

संभाव्य उमेदवार : सुप्रिया सुळे (बारामती), प्रफुल्ल पटेल (भंडारा-गोंदिया), संजीव नाईक (ठाणे), छगन भुजबळ (नाशिक), संजय पाटील (ईशान्य मुंबई), आनंद परांजपे (कल्याण), राजीव राजाळे (नगर), लक्ष्मण जगताप (मावळ), डॉ. पद्ममसिंह पाटील (उस्मानाबाद), सूर्यकांता पाटील (हिंगोली), ए. टी. पवार (दिंडोरी), उदयनराजे भोसले (सातारा) ही नावे निश्चित करण्यात आली. अन्य मतदारसंघांतील नावांबाबत आणखी चर्चा करण्यात येणार आहे.

पवार यांची सावध खेळी
काँग्रेससाठी सोडण्यात येणाऱ्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली असली तरी ही नावे अंतिम करण्यात आलेली नाहीत. चार ते पाच मतदारसंघांतील नावे अद्यापही निश्चित करण्यात आलेली नाहीत. पक्षाध्यक्ष शरद पवार हे या मतदारसंघांतील स्थानिक नेत्यांशी चर्चा करून मग अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. नावे निश्चित करताना गटबाजी होऊ नये किंवा निवडून येण्याची क्षमता यालाच पवार यांनी प्राधान्य दिले आहे. एकूणच कोणतीही गडबड होऊ नये, अशी पवार यांची सावध खेळी आहे.