बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, या मागणीसाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शिक्षणापासून वंचित असलेल्या वीटभट्टीवरील मुलांची शाळा भरवून अनोखे आंदोलन केले. तसेच संघटनेच्या शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.
शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांच्या शिक्षण हक्कासाठी चार वर्षांपूर्वी  मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा होऊन तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र, अद्यापही सरकारने या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे वीटभट्टीवरील हजारो मुले शिक्षण हक्कापासून वंचित असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे सचिव किसन चौरे यांनी दिली. याच पाश्र्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने स्वातंत्र्य सेनानी साने गुरूजी यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी  वीटभट्टीवरील मुलांची शाळा भरवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन ते अडीच तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, संघटनेच्या शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण सभापतींची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.