सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य शिक्षण मंडळाचे (एसएससी) विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडू नयेत यासाठी बेस्ट फाइव्ह, पर्सेटाईल अशा विविध सूत्रांनंतर आता नवेच सूत्र पुढे येत आहे.

राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत गुणदान पद्धती बंद केली. तसेच परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आल्याने भाषा विषयांचा निकाल यंदा प्रचंड घसरला आहे. या उलट केंद्रीय शिक्षण मंडळांमध्ये अंतर्गत गुणदान पद्धती कायम असल्याने या विद्यार्थ्यांना तुलनेत भरमसाठ गुण मिळाले आहेत. यामुळे अकरावी प्रवेशाकरिता पसंतीचे महाविद्यालय मिळणे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना कठीण होऊन बसले आहे. परिणामी सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश देण्यात यावेत, अशी सूचना मुख्याध्यापक आणि पालकांकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारने ही सूचना गांभीर्याने घेतली असून केंद्र सरकार आणि सीबीएसई आणि आयसीएसईशी बोलून याबाबत निर्णय घेण्याची तयारी  दर्शविली. केवळ लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्याबाबत सरकार विचार करीत असून याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांनी मंगळवारी दिली.

अकरावी प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या या पेचामुळे सरकारवर पालकांचा दबाव वाढत आहे. त्याची दखल घेत तावडे यांनी मंगळवारी मुख्याध्यापक आणि पालकांशी चर्चा केली. त्यावेळी राज्य शिक्षण मंडळाप्रमाणेच सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्रा धरण्याबाबत विचार करू नये, अशी सूचना कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी केली. मुख्याध्यापक आणि पालक यांनी दिलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचे गुण अकरावी प्रवेशासाठी गृहीत धरल्यास, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणता येईल, असा विचार मुख्याध्यापक आणि पालकांनी आज झालेल्या बैठकीत मांडला, असेही तावडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी पाहता आयबी, आयजीसीएसई आदी बोर्डाचे विद्यार्थी राज्याच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाकरिता फारसे फिरकत नाहीत. सीबीएसई व आयसीएसईचे सुमारे साडेचार टक्के विद्यार्थी राज्याच्या कनिष्ठ महाविद्यालयीन अकरावीला प्रवेश घेतात, ही वस्तुस्थिती तावडे यांनी यावेळी निदर्शनास आणली. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य मिळेल. मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य मिळाणार नाही, ही भिती अनाठायी असल्याचे मत तावडे यांनी मांडले. तरिही मुख्याध्यापक आणि पालक यांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचा विचार करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. या बैठकीच्या वेळी शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सुमारे १५ शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच काही पालक उपस्थित होते.