टाळेबंद इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रांची एकूण संख्या ४४, एकाही चाळीचा वा झोपडपट्टीचा समावेश नाही मुंबई : डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आणि जानेवारीमध्ये करोनाचा उद्रेक झाला. रुग्णसंख्या वाढत असताना नव्या नियमानुसार सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या मात्र बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे आदेश पालिकेने जार केले. त्यानुसार सुमारे सव्वानऊ लाख मुंबईकर आजही गृहविलगीकरणातच आहेत. डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात करोनाबरोबरच ओमायक्रॉनचाही धोका वाढू लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले. त्याचबरोबर सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या मात्र बाधित असलेल्यांना सात दिवस गृहविलगीकरणात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. बाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांनाही सात दिवस गृहविलगीकरणात राहणे भाग पडले. परिणामी, गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. पालिकेकडून उपलब्ध झालेल्या १९ जानेवारीच्या आकडेवारीनुसार सौम्य लक्षणे असलेले, लक्षणे नसलेले मात्र बाधित असलेले आणि त्यांच्या संपर्कातील असे तब्बल नऊ लाख ३९ हजार २५४ मुंबईकर गृहविलगीकरणात आहेत. करोना संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १० लाख १७ हजार ९९९ मुंबईकर बाधित झाले. त्यापैकी नऊ लाख ६६ हजार ९८५ रुग्ण करोनामुक्त झाले असून १६ हजार ४८८ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. तर उपचाराधिन रुग्णांची संख्या ३१ हजार ८५६ इतकी आहे. त्यापैकी २६ हजार ७५९ जणांना लक्षणे नाहीत, तर चार हजार ५०७ रुग्णांना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आहेत. तर ५९० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल एक कोटी ४० हजार ३०९ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले. यापैकी ५८ लाख ३४ हजार ८४८ संशयित रुग्ण अतिजोखमीच्या, तर ४२ लाख पाच हजार ५६१ संशयित रुग्ण कमी जोखमीच्या गटातील होते. आतापर्यंत ९१ लाख ५१३ संशयीत रुग्णांनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. तर नऊ लाख ३९ हजार २५४ रुग्ण आजही गृहविलगीकरणात आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने संशयित रुग्ण गृहविलगीकरणात असताना टाळेबंद इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रांची एकूण संख्या मात्र ४४ आहे. तर मुंबईतील एकही चाळ वा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही. रुग्ण सापडल्यामुळे पूर्वी २,७९८ चाळी आणि झोपडपट्टीचा भाग प्रतिबंधित करण्यात आला होता. मात्र आता या निर्बंधांतून या भागांची मुक्तता झाली आहे. तसेच बाधित सापडल्याने ६६ हजार २९१ इमारती टाळेबंद कराव्या लागल्या होत्या. आता या इमारती निर्बंधमुक्त झाल्या आहेत.