मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या १४ झाली असून गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोटीला भगदाड पडले. त्यातून पाणी आत शिरल्यामुळे बोट बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ नौका तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह असे एकूण ११५ जणांना बचाव कार्यात वाचवण्यात आले. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील आठ मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आल्याचे पोलिसांनी सांगितले. नीलकमल बोटीच्या सांगाड्यात गुरूवारी आणखी एक मृतदेह सापडला. मृत व्यक्ती बोटीतच अडकून पडली होती. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा…अपघातग्रस्तांसाठी बसची व्यवस्था उपचाराअंती जखमींना घरी पोहोचविले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर नीलकमल बोटीतील हंसराज भाटी(४३) व जोसान मोहम्मद निसार अहमद पठाण(७) बेपत्ता आहेत. तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टरद्वारे त्यांचा शोध घेण्यात आला. कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१)), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.