रायगड जिल्ह्य़ात सामाजिक बहिष्काराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावातील संदेश रामजी शिगवण यांच्या कुटुंबाला जमिनीच्या वादातून पंच कमिटीने बहिष्कृत केले असल्याची तक्रार श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील जात पंचायती आणि गाव पंचायतींच्या जाचाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कोंझरी गावातील संदेश रामजी शिगवण आणि त्यांचे कुटुंब सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. गावातील नातेवाईक आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांना शिगवण यांच्या कुटुंबाशी संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्याशी जो संबंध ठेवेल त्यांच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्याचा ठराव, मुंबईतील गावच्या मंडळाने केला. गावात होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभागी होण्यास शिगवण यांच्यावर बंदी घालण्यात आली, तर गावातील तळ्यावर कपडे धुण्यावरही र्निबध आणण्यात आले आहेत. संदेश शिगवण यांचे किराणा मालाचे दुकान असून त्यावरही गावाने बहिष्कार टाकल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधनही संपले आहे. याबाबत जाब विचारला असता गावातील काही लोकांनी घरावर चाल करून हल्ला चढवल्याचेही या पीडित कुटुंबाने सांगितले. गावात बबन खेरटकर यांची जमीन आहे. ती गावकीची असल्याचा पंच कमिटीचा दावा आहे. ती जमीन विकण्यासाठी खेरटकर यांना शिगवण कुटुंबाने मदत केल्याच्या संशयातून या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस म्हणतात, हा नुसता तंटा!
पोलिसांनी मात्र हा वाळीत टाकण्याचा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा एका समाजातील कौटुंबिक वाद असून तंटामुक्ती योजनेच्या माध्यमातून वाद मिटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पुढील आठवडय़ात म्हसळा पोलीस निरीक्षक या संदर्भात गावात बठक घेणार असल्याचे रायगडचे पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी सांगितले.    

More Stories onरायगडRaigad
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchayat ban on family in raigad
First published on: 11-11-2014 at 02:47 IST