अनिश पाटील

शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची ओळख. म्हणूनच पुण्यातील नामांकित विद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशांतूनही अनेक विद्यार्थी येतात. मात्र घरापासून लांब असलेले अनेक तरुण-तरुणी नशेच्या आहारी जात आहेत. पुण्यातील दोन तरुणी नशेत असल्याची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाला याची चिंता सतावू लागली आहे. कोवळ्या वयात मुलांपर्यंत अमली पदार्थ पोहोचतात तरी कसे? आणि पालक म्हणून आपण कोणती सतर्कता बाळगू शकतो? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

फार पूर्वीपासून अमली पदार्थ तस्करी करून देशात आणले जातात. पूर्वी मुंबईतील गोदीमध्ये तंबाखूची तस्करी व्हायची. तंबाखूची जागा पुढे चरस, गांजाने घेतली. कोकेनच्या पैशांवर एके काळी अधोविश्व पोसले जात होते. रस्ते, पाणी आणि हवाई मार्ग तस्करांनी काहीच सोडले नाही. दाऊद टोळीने तर इक्बाल मिर्चीच्या मदतीने अमली पदार्थांच्या व्यापारातून मोठी माया कमवली व त्याच्या बळावर अधोविश्वावर सत्ता गाजवली. कोकेन, हेरॉईनसारख्या अमली पदार्थांसोबत पुढे बाजारात रासायनिक अमली पदार्थ आले आणि रासायनिक कारखान्यांच्या माध्यमातून देशातच केटामाईन, एम्फेटामाईन, एफिड्रीनसारख्या अमली पदार्थांची निर्मिती होऊ लागली. सध्या डार्क नेट, आंतरराष्ट्रीय पोस्ट, कुरिअर सेवा, जहाजांवरील कंटेनरच्या माध्यमातून तस्करीवर भर दिला जात आहे. करोनाकाळात अशा प्रकारच्या तस्करीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे तरुणांना सहजासहजी अमली पदार्थ मिळत आहेत.

हेही वाचा >>> साडी-चोळी दिली नाही, सूड भावनेतून तीन महिन्यांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून; तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा

चांगल्या-वाईट गोष्टींची पारख नसलेल्या वयात मित्र मंडळींच्या गराड्यातून अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक तरुण-तरुणी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करून घेतात. ही भुकटी खाल्ली की अभ्यासात लक्ष लागते, झोप येत नाही, वजन वाढत नाही, त्वचा उत्तम राहते, अशा भाकड कथांना बळी पडून अनेक तरुण अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. मित्र मंडळींत नशा करणे ‘कुल’ असल्याचे समजले जाते. यालाही तरुणाई बळी पडते. मुंबईत याबाबत एक घटना घडली होती. एका बड्या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर कार्यरत असलेल्या महिलेला तिच्या मुलाच्या बदलत्या वागणुकीवरून संशय आला. त्या वेळी तिने त्याचे पाकीट तपासले असता त्यांना त्यात अमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या. विशेष म्हणजे याबाबतची विचारणा केली असता मुलाने उद्धटपणे तुला माझे पाकीट तपासण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले. आता पाणी डोक्यावरून गेले असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाची मदत मागितली. पोलिसांनीही त्याचे समुपदेशन केले. पण पालक म्हणून अनेकांना असे अनुभव येतात.

अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सॲप गट किंवा फेसबुकवर एक सांकेतिक भाषा वापरून मेजवानीचे आयोजन केले जाते. या मेजवानीत कोकेन, केटामाइन आणि टूसीबीसारखे अमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुण लाखो रुपयांची उधळण करतात. शहरातील बहुतांश हॉटेल्समध्ये अमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठमोठ्या ठिकाणी ‘इव्हेंट मॅनेजमेन्ट’ किंवा कुरिअरच्या माध्यमातून तस्कर पार्टीत अमली पदार्थ आणतात.

अमली पदार्थांच्या विक्रीसाठी विक्रेते या पदार्थाचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून अनेक जण या व्यसनाच्या आहारी जातात. मेफेड्रॉनमुळे (एमडी) ‘झिरो फिगर’ व ऊर्जा मिळते, असा अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासनतास नाचण्यासाठी बारबाला सध्या मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत. गुटख्यामध्ये मिसळून बारबाला एमडीचे सेवन करत आहेत. सध्या मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय महाविद्यालयातील तरुणांना या जाळ्यात ओढण्यासाठी एमडीमुळे झोप येत नाही, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, एमडीमुळे त्वचा सतेज राहते, असे पसरवण्यात येत आहे. या भूलथापांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी बळी पडतात. सुंदर मुलींना हेरून विक्रेते त्यांना मोफत एमडी पुरवतात. चार-पाच वेळा ते घेतल्यानंतर त्यांना याचे व्यसन लागते. मग विक्रेते त्यांना या पदार्थांच्या विक्रीत गुंतवतात. अशा विद्यार्थांच्या मदतीने ते इतर विद्यार्थांनाही या नशेच्या जाळ्यात ओढतात. पश्चिम उपनगरातील अशीच उच्चभ्रू घरातील मुलगी या तस्करांमध्ये गुंतली होती. त्यातून तिने घरातून पलायनही केले होते. पण केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) तिचे समुपदेशन केले. तसेच शाळेतील मुलांना हेरण्यासाठी कॅंडी व चॉकलेट्मध्येही अमली पदार्थ भरून त्याला याचे व्यसन लावण्यात येते.

हेही वाचा >>> भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

अमली पदार्थांमुळे सुरुवातील शरीरात ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते. पण त्यानंतर मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा असे आजार जडतात. त्यानंतर एखाद्याचा अगदी तडफडून मृत्यू होतो. तसेच या पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ते मिळाले नाही तर सुरुवातीला त्याचे हातपाय थरथरणे, डोके दुखणे, संभ्रम, जीव कासावीस होणे, आदी त्रास होतो. काहींना फिट्सही येतात, तर काहींचा मृत्यूही होतो. एमडी या अमली पदार्थाचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तीचा तर दोन ते तीन वर्षांत मृत्यू होतो. तरुण पिढी सर्वाधिक एमडीचे सेवन करत आहे. आपले पाल्य घराबाहेर काय करते, याकडे कायम लक्ष ठेवणे शक्य नसले तरी घरातील त्याच्या वागणुकीतून बऱ्याच गोष्टी कळू शकतात. पालकांनी आपल्या मुलांच्या वागण्यातील बदल लक्षात घेतले तर वेळीच आपल्या पाल्याची अमली पदार्थाच्या विळख्यातून सुटका करता येऊ शकते. त्याची सुरुवात शारीरिक बदलापासून होते. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली मुले अधिक निष्काळजी बनतात. ते त्यांच्या दिसण्याकडे लक्ष देत नाहीत. कपड्यावरही लक्ष देत नाहीत. अनेक वेळा दाढी करत नाहीत, आंघोळही करणे टाळतात. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांच्या वागण्यातही बदल होतात. सर्वांसोबत राहणारी मुले व्यसनामुळे एकांतात राहणे पसंत करतात. कुटुंबीय, इतर नातेवाईकांपासून दूर राहतात. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणे बंद करतात, उत्सव साजरे करण्यापासून दूर राहतात. जुने मित्र सोडून त्यांच्यासारख्याच अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या मुलांसोबत मैत्री करतात. त्यांच्या हालचालींमध्ये शिथिलता येते. खेळात उत्तम असलेली मुलेही त्यापासून दूर राहतात. त्यांची कार्यक्षमता मंदावते, लवकर दम लागतो. त्यांना तात्काळ राग येतो. पालकांच्या अंगावर ओरडणे असे बदलही मुलांमध्ये पाहायला मिळतात. या काही गोष्टींवर लक्ष ठेवल्यास आपण वेळीच पाल्याला या विळख्यातून बाहेर काढू शकता.