दोन किलोमीटरच्या परिघातच नागरिकांनी खरेदी किंवा व्यायाम करावा, ही अट रद्द केल्याचे शासनाने शुक्रवारी स्पष्ट केले असले, तरी मुंबई पोलीस दलाकडून शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमधला संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली. या प्रत्येक टप्प्यावर पोलिसांनी नागरिकांना घराजवळच खरेदी, व्यायाम करण्याचे आवाहन केले. मात्र २८ जूनला पहिल्यांदाच पोलिसांनी समाजमाध्यमांवरून जारी के लेल्या आवाहनात दोन किलोमीटरच्या मर्यादेचा स्पष्ट उल्लेख केला आणि संभ्रम वाढवला. विरोधाभास हा की टाळेबंदीत पोलिसांनी फौजदारी दंड संहितेतील कलम १४४चा आधार घेत आजवर काढलेल्या एकाही आदेशात नागरिकांचा संचार मर्यादित ठेवणारा नेमका परीघ किंवा अंतर मर्यादेचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे दोनच दिवसांनी पोलिसांनी जारी केलेल्या आदेशातही दोन किलोमीटरऐवजी घराजवळील दुकाने, केशकर्तनालये, स्पा येथे जाण्यास नागरिकांना मुभा आहे, असा उल्लेख आढळतो. मात्र या आदेशात दोन दिवसांपूर्वी लादलेली दोन किलोमीटरची अट मागे घेतली, असे कुठेही नमूद नाही.

याबाबत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. नवनियुक्त पोलीस प्रवक्ते संग्रामसिंग निशाणदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ३० जूनचे आदेश आणि त्यातील घराजवळील या शब्दाकडे बोट दाखवले.