मुंबई : वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधला जाणार आहे. त्यासाठी प्रभादेवी पूल बंद करत त्याचे पाडकाम करण्याकरिता एमएमआरडीए फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हते. आता शुक्रवारी रात्री ११.५९ वाजता हा पूल बंद केला जाणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
पूल बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून द्विस्तरीय पूल बांधून सेवेत दाखल होईपर्यंत अर्थात पुढील किमान २० महिने हा बदल असेल.फेब्रुवारीत पूल बंद करत पाडण्यात येणार होता. मात्र परीक्षांचा काळ लक्षात घेता पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर एप्रिलमध्ये वाहतूक पोलिसांनी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रकल्पात बाधित होणारे रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी विरोध करत पूल बंद होऊ दिला नाही.
बाधितांच्या योग्य पुनर्वसनाच्या ठोस निर्णयाशिवाय पूल बंद होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली. तर एप्रिलनंतर एमएमआरडीएने गणेशोत्सवानंतर पूल बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली. त्यानुसार बुधवारी, १० सप्टेंबरला पूल बंद करण्याचे निश्चित करत वाहतूक पोलिसांनी बुधवारी प्रभादेवीत पूल बंद करण्यासंबंधीचे फलक लावण्यास सुरुवात करताच रहिवासी रस्त्यावर उतरले. या रहिवाशांनी फलक हटवले आणि पूल बंद होऊ न देण्याची आक्रमक भूमिका घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी बुधवारी पूल बंद केला नाही.
त्याच परिसरात सदनिका
बुधवारच्या रहिवाशांच्या विरोधानंतर गुरुवारी बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासंबंधी बैठकांवर बैठका झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंबंधी बैठक घेत प्रकल्पातील बाधित दोन इमारतींतील रहिवाशांना त्याच परिसरात म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये घरे देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली.