उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी मंगळवारीही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले. विरोधकांनी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे दिवसभरात कामकाज सातत्याने तहकूब करावे लागले. इंदापूर तालुक्यातील निंबोळीमध्ये अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे. पवार यांनी घडल्याप्रकाराबद्दल माफी मागितल्यानंतरही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये.
मंगळवारी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज सातत्याने तहकूब करण्यात आले. विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यावर दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
केवळ माफीनामा उपयोगी नाही. अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभागृहात या प्रकरणाबद्दल माफी मागावी आणि अजित पवार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांचाही अपमान केला असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.