मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी, सातही धरणांतील पाणीसाठा ८९ टक्क्यांवर स्थिरावला आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये प्रचंड वाढलेला पाणीसाठा आता गतवर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी असल्याचे समोर आले आहे. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा ५०.७५ टक्क्यांवर पोहोचला होता. गतवर्षी तो केवळ ८.५९ टक्के होता.

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये १२ लाख ९० हजार ६११ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईकरांची पाणीचिंता मिटली होती.

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधारांमुळे धरणे ५० टक्के भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. सातही धरणांमध्ये मिळून २६ जुलै रोजी ८८.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. २७ जुलै रोजी पाणीसाठ्यात वाढ होऊन तो ८९.७० टक्क्यांवर पोहोचला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा ८८ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर जवळपास सात दिवस हा पाणीसाठा ८८ टक्क्यांवरच स्थिरावला होता. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस कोसळेल अशी आशा मुंबईकरांना होती. मात्र, प्रत्यक्षात पावसाने दडी मारली आहे. ३ ऑगस्ट रोजी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे ८८.९४ टक्क्यांवरील पाणीसाठा ८९.०९ टक्क्यांवर पोहोचला. मात्र, त्यानंतर आतापर्यंत त्यात वाढ झालेली नाही. सुमारे ९ दिवसांपासून पाणीसाठा ८९ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत तो २ टक्क्यांनी कमी असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये मिळून ८९.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ऊर्ध्व वैतरणामध्ये ८३.४२ टक्के, मोडकसागरमध्ये २३ टक्के, तानसामध्ये ९७.९२ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९४.६९ टक्के, भातसामध्ये ८७.१४ टक्के, विहारमध्ये ७४.९३ टक्के, तुळशीमध्ये ८५.५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या तुरळक पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात धरणांच्या पाणथळ क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे त्या पावसाचे पाणी आताही धरणात येते. मुंबईला जेवढा पाणीपुरवठा होतो. तेवढा त्यातून भरून निघतो. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा स्थिरावला असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

११ ऑगस्टचा गेल्या तीन वर्षातील पाऊस

(पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये)

२०२५ – १२९०६११

२०२४ – १३३४४८६

२०२३ – ११८८०७६