मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहावा यासाठी अजित पवार गटाच्या बंडखोरांनी सोमवारी पुन्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने सुरू ठेवले आहेत. लागोपाठ दुसऱ्या दिवशी बंडखोर गटाचे आमदार शरद पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम आणि संशय निर्माण झाला आहे. मात्र, भाजपला पाठिंबा देणार नाही या भूमिकेवर शरद पवार ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे कामकाज पार पडल्यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्रात पोहोचले. त्यावेळी तेथे शरद पवार उपस्थित नव्हते. पण १० ते १५ मिनिटांत पवार तेथे आले. बंडखोर आमदारांनी पवारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रविवारी पवार यांची भेट घेऊन पक्ष एकसंघ ठेवण्याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. त्यावर पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही सोमवारी दुपारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी पवारांची भेट घेतली. पवारांनीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, असे सांगण्यात आले.

पवारांची भूमिका अगदी स्पष्टच.. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांनी मेहनत घेऊन उभे केलेले एक कुटुंब आहे. पक्षाचे आमदार, काही लोक भेटण्यासाठी आले होते. पवार प्रत्येकाला भेटत असतात. राजकारणात संवादाला महत्त्व आहे. पवारांनी आपली भूमिका येवला सभेत स्पष्ट केली आहे. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. त्यानंतर अडीच वर्षे शिवसेनेबरोबर एकत्र काम केले आहे. त्यामुळे पवारांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भेटीवर टीका

राष्ट्रवादीतील बंडानंतर लागोपाठ दुसऱ्या दिवशी बंडखोरांनी शरद पवार यांची भेट घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या. शरद पवार यांनी बंडखोरांची भेट घेणे टाळायला हवे होते, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.