रिक्षा-टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी पुढे येण्याचे आवाहन करूनही खासगी संस्थांसह शहरातील सरकारी औद्योगिक संस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे.
मुंबई मधील रिक्षा आणि टॅक्सींच्या मीटर कॅलिब्रेशनचे काम सध्या कांदिवली येथील ठाकूर पॉलिटेक्निक, वांद्रे येथील फादर अ‍ॅग्नेल इन्स्टिटय़ूट आणि भायखळा येथील साबूसिद्दीक पॉलिटेक्निक या संस्थांकडून करून घेण्यात येत आहे. शहरातील रिक्षा किंवा टॅक्सीच्या मीटरमधील फेरबदल करण्यासाठी याच तीन संस्थांकडे परिवहन विभागाकडून काम दिले जात आहे.
रिक्षा-टॅक्सी मीटरच्या कॅलिब्रेशनसाठी मुदतीचे बंधन असल्याने आणखी काही आणखी काही संस्थांकडून काम करून घेण्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला शुक्रवारी सुनावले होते. मात्र याआधी तसा प्रयत्न करूनही त्यास प्रतिसादच मिळाला नसल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मुलुंड, ठाणे आणि भायखळा येथील औद्योगिक संस्थांच्या प्राचार्याशी परिवहन विभागाने चर्चाही केली होती. त्यांनी मीटर कॅलिब्रेशन आणि तपासणी यासाठी मदतही करण्याचे आश्वासन दिले.