मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ ते ८ जूनदरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेले वादग्रस्त पत्र मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. याच पार्श्वभूमीवर, देवनार पशुवधगृहातील कत्तल शुल्कात केलेली वाढ मागे घ्यावी आणि वर्षभरासाठी २० रुपये कत्तल शुल्क करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना गुरांचे बाजार बंद करण्याबाबत पत्र पाठवले होते. मात्र, या पत्रामुळे नाराजी पसरली होती. हे पत्र मागे घेण्याबाबत आमदार रईस शेख सातत्याने पाठपुरावा करीत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. या बैठकीतही आमदार शेख यांनी सदर पत्र मागे घेण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली.

देशभरात येत्या ७ जून रोजी बकरी ईद साजरी होत आहे. राज्यात गोवंश हत्याना कायद्यानुसार बंदी आहे. मात्र, गोवंश हत्त्येच्या नावाखाली राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे आदेश २७ मे रोजी पत्राद्वारे देण्यात आले होते. यामुळे ईदच्या कुर्बानीला बकरी मिळणे मुश्किल झाले होते, असे रईस शेख यांनी सांगितले. गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, वाहन चालकांना मारहाण करतात. अशी बेकायदेशीर कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. अखेर गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भातील पत्र मागे घेण्यात आल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, देवनार पशुवधगृहात आकारण्यात येणाऱ्या कत्तल शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मागे घ्यावी आणि वर्षभरासाठी २० रुपये कत्तल शुल्क आकारावेवे. तसेच, देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण करावे आणि मुंबईत मांस बाजार पूर्व, पश्चिम आणि उपनगर असे विकेंद्रीत पद्धतीने करावे, अशी मागणी रईस शेख यांनी यावेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.