पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू आहेत, पण देशात सुरू असलेल्या आंतरिक सुरक्षेच्या मामल्यावर डोळे झाकता येणार नाहीत. कश्मीरात पंडितांच्या हत्या सुरूच आहेत आणि आता पंजाबात पुन्हा खलिस्तानी खदखद उफाळून येत आहेत. मात्र, अंधभक्तांचे विश्वगुरू त्यावर काहीच बोलत नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक सदराद्वारे केली आहे. तसेच राजकीय नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईवरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

हेही वाचा – VIDEO : “सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं”, विजय शिवतारे यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आधी…”

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“भारतीय जनता पक्ष अहंकार व उर्मटपणाच्या कळसावर पोहोचला आहे. त्या टोकावरून आता त्यांना देशाचे खरे प्रश्न दिसत नाहीत. अदाणी यांचा भ्रष्टाचार पाठीशी घालून त्यांना वाचविणारे सरकार कश्मिरी पंडितांना वाचवत नाहीत, हे नोंद करण्यासारखे आहे. महाराष्ट्रासह सर्वत्र भाजपापुरस्कृत सकल हिंदू आक्रोश मोर्चे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात काढले जात आहेत. असे सकल हिंदूंचे आक्रोश मोर्चे कश्मिरी पंडितांच्या हत्येविरोधात का निघत नाही?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

“भाजपाकडून समाज बिघडवण्याचा प्रयत्न”

“या सकल मोर्चावाल्यांनी जम्मू-कश्मीरातील हिंदूंचे हाल काय ते समजून घेतले नाहीत. पुलवामाच्या बाजारात संजय शर्मांची हत्या त्यांच्या पत्नीसमोर झाली. तेथे हिंदू मोर्चा निघाला असता, तर बरे झाले असते, पण तेथे शेपट्या घालायच्या व महाराष्ट्रात ‘हिंदू खतरे में’ म्हणून छाती पिटायची. हे राजकारण समाज बिघडवत आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

“अशी हिंमत खलिस्तानवाद्यांच्या बाबतीत का दाखवत नाहीत?”

“कश्मीरात हे वातावरण असताना बाजूच्या पंजाबात पुन्हा एकदा खलिस्तानचा झेंडा फडकावा हे धक्कादायक आहे. एका आरोपीस सोडविण्यासाठी ‘खलिस्तान’चे नारे देत मोठा जमाव पोलीस स्टेशनवर चाल करून जातो, ही केंद्रीय सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. खलिस्तानचे गाडलेले भूत तेथे पुन्हा जिवंत होताना दिसत आहे. अमृतपाल सिंह हा खलिस्तानी चळवळीचे नेतृत्व करतोय आणि हिंसा घडवून आणतो आहे. त्याच्या चळवळीस पैसा कोठून येतो, याचा तपास करण्याची हिंमत मोदी-शहांच्या प्रिय ‘ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स’ने दाखवायला हवी. अशी हिंमत ते अदानींच्या बाबतीत दाखवू शकले नाहीत व पंजाबातील खलिस्तानवाद्यांच्या बाबतीतही दाखवणार नाहीत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – देशाच्या राजकारणाचे चित्र बदलतेय!, शरद पवार यांची टिप्पणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दिल्लीचे ‘निरो’ फक्त देशभक्तीची बासरी वाजवतात”

“दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना सीबीआयने अटक केली. तसा फास पंजाबात खलिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांच्या बाबतीत का आवळला नाही? सरळ सरळ परदेशी पैसा या चळवळीत पुन्हा येऊ लागला व मोदी-शहा त्यावर गप्प आहेत. हा विषय देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आहे. त्यामुळे राज्य सरकारवर हे सर्व ढकलून चालणार नाही. तुम्ही देशाचे राज्यकर्ते आहात व सध्या ‘बादशाही’ पद्धतीने राज्य करत आहात. कश्मीर व पंजाबातील घटनांपासून तुम्हाला पळ काढता येणार नाही. दोन्ही सीमावर्ती राज्ये आता स्पह्टक स्थितीतून जात आहेत. कधीही आग लागेल अशी स्थिती असताना दिल्लीचे ‘निरो’ फक्त देशभक्तीची बासरी वाजवीत आहेत”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.