भाजपा आणि एनडीएला इंडियाची भीती वाटते आहे. आम्हाला मिळणारा लोकांचा पाठिंबा वाढतो आहे त्यामुळे भाजपाच्या पोटात गोळा आला आहे. आमच्या इंडियाच्या बैठका वाढल्या की देशातली महागाई कमी होणार आहे. कारण हे सरकार इंडियाला घाबरलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे? भाजपा आणि एनडीएमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण त्यांना हे माहित आहे की २०२४ मध्ये इंडिया को हराना मुश्कीलही नहीं नामुमकीन है, असा डायलॉगही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बुधवारी ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली. तो राखीचा धागा जसा बळकट आहे त्याचप्रमाणे इंडिया आघाडीची एकजू आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही सगळे पक्ष एकमेकांसह अशा नात्यात बांधलो गेलो आहोत जे नातं देशभक्तीचं आहे. आमच्यात कुठलेही मतभेद आणि मनभेद नाहीत. पूर्ण तयारीनिशी आम्ही बैठक घेत आहोत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. इंडिया आघाडीची मुंबईत बैठक आज संध्याकाळी इंडियाची बैठक सुरु होईल. ही बैठक उद्याही चालणार आहे. देशासमोर आम्ही एक अॅक्शन प्लान घेऊन जात आहोत. ज्या गोष्टी आम्ही बैठकीत ठरवणार आहोत त्याची चर्चा आम्ही पत्रकारांशी करणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला समजतील. मात्र ही पुन्हा तुम्हाला सांगतो आहे, इंडियाची ताकद पाहून हे सरकार घाबरलं आहे. सीमेवर चीनने जी घुसखोरी केली आहे ती घुसखोरीही चीन आमची ताकद पाहून मागे घेईल असाही विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. चांद्रयान ३ खाली बोलवून बैठक घ्या किंवा वर्षा बंगल्यावर बैठक घेऊ द्या काही फरकत पडत नाही. इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापालाही शक्य नाही. आमच्यात कुठलंही पोस्टर वॉर नाही. राहुल गांधी हे महत्त्वाचे नेते आहेत. लोकांनी त्यांना नेता मानलं आहे. आम्हाला सगळ्यांना वाटतं की राहुल गांधी ज्या प्रकारे वातावरण आणू इच्छितात. राहुल गांधींवर लोकांचं प्रेम आहे. आम्ही जेव्हा सगळे पक्ष एकत्र येऊ तेव्हा काय तो निर्णय घेऊ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.