मुंबई: मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी सुकर करण्यासाठी उत्तन ते विरार दरम्यान २४ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या प्रकल्पाची उभारणी करणार असून दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर दरम्यानच्या सागरी सेतूची व्यवहार्यता तपासण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे, अंधेरीसारख्या उपनगरापासून विरार, पालघरसारख्या शहरांपर्यंत पर्यायी मार्ग तयार करण्याच्या हालचाली  सुरू आहेत. त्यातूनच सागरी सेतूचा पर्याय पुढे आला असून राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) वरळी- वांद्रे सागरी सेतू बांधण्यात आला असून आता दुसऱ्या टप्यात वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात वर्सोवा ते विरार या ४२ किलोमीटर सागरी सेतूची आखणी एमएमआरडीएने सुरू केली होती. मात्र मुंबई पालिकेने वर्सोवा- दहिसर- भाईंदर दरम्यान सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे वर्सोवा- विरार सागरी सेतू मार्गातील वर्सोवा- उत्तन याट्प्प्यातील सागरी सेतू रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी उत्तन ते विरार दरम्यान २४.२५ किलोमीटर  सागरी सेतू बांधण्यात येणार असून त्याला १० किलोमीटर लांबीचा उत्तन जोड रस्ता, २.५ किलोमीटर लांबीचा वसई जोडरस्ता आणि १७.८७ किलोमीटर लांबीचा विरार जोडरस्ता असेल. 

हेही वाचा >>> आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ; राष्ट्रीय अभियानातील कंत्राटी कर्मचारी कायम; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांचे नामांतर

ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी करण्यात येत होती. यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील दोन, पश्चिम रेल्वे मार्गावरील दोन तर हार्बर रेल्वे मार्गावरील चार अशा आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येईल.

रेल्वे स्थानकांची नावे बदलताना मंत्रिमंडळाला सादर करण्यात आलेल्या टिप्पणीत नवीन नाव का देण्यात येत आहे याची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. उदा. करी रोडचे लालबाग नामांतर हे मूळ नाव असल्याने देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. पण किंग्ज सर्कलला र्तीथकर पार्श्वनाथ हे नाव का देण्यात येत आहे याची कारणमिमांसा करण्यात आलेली नाही.

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात रेल्वे स्थानकाची नावे बदलण्याचा ठराव मंजूर केला जाईल व त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राला पाठविला जाईल.

नवीने नावे :

करी रोड – लालबाग

सॅन्डहर्स्ट रोड – डोंगरी

मरीन लाईन्स – मुंबादेवी

चर्नी रोड – गिरगांव

ग्रँटरोड – गावदेवी

कॉटन ग्रीन – काळाचौकी

डॉकयार्ड ड्ढ माझगाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंग सर्कल – र्तीथकर पार्श्वनाथ

मंत्र्यांची नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या प्रस्तावास मान्यता देताना शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी ग्रामीण भागात विकासकामे करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून निधीच मिळत नसल्याची तक्रार केली. ग्रामविकास विभागाकडून आमदारांना त्यांच्या मतदार संघात काही निधी मिळतो. मात्र हा निधी मिळत नसल्याची तक्रार काही मंत्र्यांनी केली. त्यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाजन आणि अन्य मंत्र्यांमध्ये झालेल्या वादावादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत, आता लगेच निधी देऊन काही कामे होणार नाहीत. तुम्ही मतदारसंघात घोषणा करा, लोकसभा निवडणुकीनंतर लगेच निधी देऊ, असे सांगत मंत्र्यांचा राग शांत केला.