मुंबई : बांधकाम व्यवसायातील सदनिकांच्या खरेदी – विक्रीचा व्यवहार करणाऱ्या दलालांना महारेराने परीक्षा आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. या निर्णयानुसार नव्या, जुन्या दलालांना १ सप्टेंबरपासून प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने प्रशिक्षण आणि परीक्षांना सुरुवात झाली असून पहिली परीक्षा याधीच पार पडली आहे. तर आता ६ ऑगस्ट रोजी दुसरी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ३,१३७ दलाल पात्र ठरले असून यात पंढरपूर, लातूर, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूरसह पुणे, मुंबईतील दलालांचा समावेश आहे.

रेरा कायद्यानुसार विकासकांना आणि स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणी असेल तरच दलाला म्हणून काम करता येते. मोठया संख्येने ग्राहक दलालांच्या माध्यमातूनच घर खरेदी – विक्रीचे व्यवहार करतात. पण या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण – प्रशिक्षण नाही. त्यामुळे कोणीही हा व्यवसाय करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या, या क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसलेल्यांना रोखण्यासाठी महारेराने १ सप्टेंबरपासून महारेरा नोंदणीसाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

हेही वाचा >>> मध्य रेल्वेला पावसाचा फटका, सिग्नल यंत्रणेत बिघाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर महारेराने प्रशिक्षण प्रकियेस सुरुवात केली आहे. यासाठीचा अभ्यासक्रम अखिल भारतीय स्थानिक स्वयं प्रशासन संस्थेने (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नस) तयार केला आहे. तर आयबीपीएसच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यानुसार २० मे रोजी पहिली परीक्षा झाली असून ४२३ दलाल या परीक्षेस बसले होते.  यापैकी ४०५ दलाल उत्तीर्ण झाले आहेत. तर आता दुसरी परीक्षा ६ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असून यात ३१३२ दलाल सहभागी असणार आहेत. या ३१३२ पैकी पुण्यातील सर्वाधिक १७७१, तर मुंबई महानगर प्रदेशातील ११५५ दलालांचा त्यात समावेश आहे.