मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जून २०२५ पासून ४६ ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जाहीर केला. एसटीच्या ८८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, एक सरकारी वैद्याकीय योजना, अपघाती विमा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर मोफत प्रवासाची मुभाही देण्यात आली आहे. एसटी महामंडळातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी (पान ६ वर) (पान १ वरून) उपस्थित होते. महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर सध्या ४६ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. परंतु, या महिन्यापासून मूळ वेतनावर सात टक्के वाढ करून ५३ टक्के महागाई भत्ता अदा केला जाणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून ही वाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वाढ देण्यात यावी, अशी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
बैठकीत एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत यावरही चर्चा झाली. राज्यातील सामान्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या एसटीच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. केवळ नवीन बसगाड्या न घेता बस आगार स्वच्छ ठेवण्यावर महामंडळाने भर द्यावा. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य द्या. एसटीच्या माध्यमातून मालवाहतूक सेवा सुरू करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
दोनपैकी एक योजनेचा पर्याय
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत रोख रक्कमविरहीत वैद्याकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे वैद्याकीय प्रतिपूर्ती योजनाही कर्मचाऱ्यांना सुरू करण्यात आली आहे. या दोनपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय एसटी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे.
एक कोटी ते ८० लाखांपर्यंत विमा लाभ
एसटीच्या कर्मचाऱ्यांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मार्फत अपघाती विमा लागू करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन या बँकेत होते, अशा कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना अथवा नसताना अपघात झाल्यास विमा कवच लागू होेणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी, पूर्णत: अपंगत्व एक कोटी, अंशत: अपंगत्वास ८० लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
वर्षभर मोफत प्रवास
एसटी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला एसटीतून मोफत प्रवास करण्यासाठी एक प्रवेशिका दिली जाते. नऊ महिन्यांसाठी देण्यात येणाऱ्या या मोफत प्रवेशिकेची मुदत तीन महिन्यांनी म्हणजे वर्षभरासाठी वाढविण्यात आली असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.