मुंबई : करोनामुळे मुंबईतील इमारतींच्या भांडवली मूल्यात सुधारणा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आल्याने मालमत्ता करातील वाढ वर्षभर टळली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेस १,०४२ कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. मुंबई महापालिका कायद्यानुसार दर पाच वर्षांनी भांडवली मूल्यात सुधारणा केली जाते, परिणामी मालमत्ता करात वाढ होते. मुंबईत याआधी २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढविण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये ही वाढ होणे अपेक्षित होते; पण करोना संकटामुळे भांडवली मूल्यात सुधारणा व करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला. पालिका प्रशासनाने या वर्षी पुढील चार वर्षांसाठी २०२५ पर्यंत पालिकेने १४ टक्के मालमत्ता करवाढीचा निर्णय घेतला होता. मात्र शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. करोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे आणि अनेक अडचणींमुळे इमारतींच्या भांडवली मूल्यात सुधारणा करण्यास २०२१-२२ करिता सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून रस्त्यांचे जाळे मुंबई : राज्यातील गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेनुसार राज्यात दोन लाख किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.