अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून राणा दांपत्याला योग्य उत्तर देण्याची तयारी केली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे. "बंटी आणि बबली पोहोचले असतील तर पोहोचू द्या. हे फिल्मी लोक आहेत. ही स्टंटबाजी, मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आणि भाजपाला आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत," असं संजय राऊत म्हणाले. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान देणाऱ्या राणा दांपत्याला बच्चू कडूंचा इशारा; म्हणाले “वाघाची नखं अजूनही…” "कोणाला स्टंटच करायचे असतील तर करु द्या, त्याने काही फरक पडणार नाही. त्यांना शिवसेनेचं मुंबईचं पाणी काय आहे याची अजून माहिती नाही. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालिसा वाचणं, रामनवमी साजरं करणं हे धार्मिक, श्रद्धेचे विषय असून नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. पण अलीकडे भाजपाने ही नौटंकी आणि स्टंट करुन ठेवलं असून त्यातील ही पात्रं आहेत. लोक यांच्या हिंदुत्वाला, नाटकबाजीला गांभीर्यानं घेत नाही," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. “मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, मला कुणी…”, खासदार नवनीत राणांचा शिवसेनेला इशारा! पुढे ते म्हणाले की, "आम्ही मुंबई, महाराष्ट्रात सर्व सण यांच्या आधीपासून साजरे करत आहोत. यांचा जेव्हा हिंदुत्वाशी काही संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही मुंबईत गुढीपाडवा, दसरा, रामजन्मोत्सव साजरे करत आहोत. हे काय आम्हाला शिकवत आहेत. यांना स्टंट करु द्या, काही हरकत नाही". "काही गुंगारे वैगेरे दिलेले नाहीत. मुंबईचे पोलीस, शिवसैनिक सक्षम आहेत. स्टंट करायचं ठरवलं असेल तर काही कारण लागत नाहीत. रामनवमी, हनुमान चालिसा, हिंदुत्व हे काय स्टंटचे विषय आहेत का ? पण भाजपाला सध्या मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार, स्टंटबाज यांची गरज लागत असून त्यांचा उपयोग करुन घेत आहेत," असा आरोप संजय राऊतांनी केला. "कोर्टात जो दिलासा घोटाळा सुरु आहे तो फक्त ठराविक विचारधारेच्या लोकांना मिळत आहे. देशाच्या न्यायवस्थेत सर्वात मोठा घोटाळा सुरु असल्याचं मी पुन्हा सांगत आहे. यासंबंधी मला इंडियन बार काऊन्सिलने माझ्याविरोधात एक याचिका दाखल केली असून मी त्याला उत्तर देईन," असं संजय राऊत यांनी नवाब मलिकांची याचिका फेटाळल्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं. "देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना नागपुरात आल्याने इथल्या मातीतून सद्बुद्धी मिळेल असं म्हटलं आहे. पण मग तुम्हा सर्व लोकांना ती का मिळाली नाही? अडीच वर्षांपूर्वी मिळाली असती तर कदाचित राज्याचं चित्र, राजकारण वेगळं असतं. तुम्ही आज कदाचित मुख्यमंत्री असता. पण आपल्या हिंदुत्ववादी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याची एक वेगळी सद्बुद्धी मिळाली आणि तुमच्यावर ही वेळ आली. सद्बुद्धीचं अजीर्ण इतकं झालं तुम्हाला की आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली.