अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप केला असून मुंबईत पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी परिस्थिती झाली असल्याचं म्हटलं आहे. कंगनाच्या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं असून आपण पोकळ धमक्या देत नाही असं म्हटलं आहे. मी शिवसैनिक असून अ‍ॅक्शनवाला माणूस आहे असंही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून अ‍ॅक्शनवाला माणूस आहे. तेव्हा या ज्या मेंटल केसेस वाढल्या आहेत त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावेत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

“या मेंटल केसेस…,” कंगनाच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप

कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता टीका केली असून हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तसंच अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. “पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठं कारस्थान दिसत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचं नाव न घेता टीका करताना “मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जे पाठीशी घालत आहेत त्या राजकीय पक्षांना मुंबई, महाराष्ट्रात मतं मागण्याचा अधिकार नाही. ही लोकं जी निवडून आली आहेत त्यांना काय पाकड्यांनी मतदान केलं आहे का ? याचा खुलासा त्या पक्षाकडून होणं गरजेचं आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणताना लाज वाटली पाहिजे. मुंबईचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला येथे राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही,” असं म्हटलं.

भाजपा नेत्यांकडून कंगनाचा उल्लेख झाशीची राणी असा केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “हा झाशीच्या राणीचा सगळ्यात मोठा अपमान आहे. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता आहे. आमची प्रेरणा आहे. महाराष्ट्राची वीरकन्या आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या टाकणाऱ्या स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि येथील राजकीय पक्ष जर झाशीच्या राणीचा अपमान करणार असतील तर देशाचं राष्ट्रीयत्व काही लोकांनी किती खालच्या स्तरावर नेऊन ठेवलं आहे हे स्पष्ट दिसतंय”.

संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचं नाव घेणं टाळलं. “कोणत्याही राजकीय पक्षाने पाठबळ निर्माण करण्याच्या हेतूने अशा व्यक्तींच्या पाठीशी उभं राहू नये, ते बुमरँग होईल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on kangana ranaut allegation of threat sgy
First published on: 04-09-2020 at 13:38 IST