नाल्याकाठच्या घरांना धोका
कांदिवलीतील शिवशक्ती येथील साई नगर भागात पावसामुळे पोयसर नाल्याची भिंत कोसळल्याने नाल्याच्या कडेला वसलेली घरे सध्या धोकादायक स्थितीत आहेत. पावसामुळे भिंतीचा तीन ठिकाणचा भाग वाहून गेला आहे.
या भिंतीचे बांधकाम सुरुवातीला कच्च्या स्वरूपाचे होते. त्यावर केवळ प्लॅस्टरचा मुलामा नंतरच्या काळात देण्यात आला. भिंतीची उंची वाढविण्यात आली. परंतु, मुळातच तिचे बांधकाम कच्चे असल्याने ती पावसात तग धरून राहू शकली नाही, अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे. भिंत वाहून गेल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पावसाळ्यात हा नाला दुथडी भरून वाहतो. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कडेला राहणाऱ्या रहिवाशांची चिंता वाढली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नाल्यालगतच्या घरात केव्हाही पाणी शिरेल अशी परिस्थिती आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणीही केली आहे. ‘सध्या पाऊस असल्याने बांधकाम शक्य नाही. तरीसुद्धा आम्ही रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करू,’ असे आश्वासन येथील पालिकेच्या आर-दक्षिण विभागाचे उप आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी दिले.
घरे सोडण्यास रहिवाशांचा नकार
येथील शिवशक्ती नगरचा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत विकास होणार आहे. मात्र, रहिवाशांना योजना प्रत्यक्षात येईपर्यंत भाडय़ाच्या घरात राहायचे नाही. विकासकाने सदनिका बांधून तयार नसल्याने त्यांना भाडे देण्याची तयारी दर्शवली आहे, असे ‘शिवशक्ती नगर गृहनिर्माण संस्थे’चे विजय मोहिते यांनी सांगितले. रहिवाशांनी मात्र मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे करत घरे सोडण्यास नकार दिला आहे. आमची पक्क्या घरात राहण्याची कायमची व्यवस्था करा किंवा नाल्याची डागडुजी करून येथेच राहायला द्या, अशी मागणी स्थानिक रहिवासी कृष्णा सरस यांनी केली आहे. रहिवाशांच्या या भूमिकेमुळे पेच अधिक वाढला आहे. तर पालिकेने पावसाळ्यात भिंतीचे बांधकाम करता येणे शक्य नाही, अशी भूमिका घेतली आहे.