मुंबई : हवामान बदलाबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चा, त्याबाबत जागृती करण्यासाठी आखण्यात येणार उपक्रम, अभ्यासक्रमांत पर्यावरण विषयांत हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्येची तोंडओळख करून देण्यात आलेली आहे. असे असतानाही प्रत्यक्षात मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना या विषयाची पुरेशी माहिती नसल्याचे ‘क्राय’ (चाइल्ड राइट्स अँड यू) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

हवामान बदलाचा मुलांवर काय परिणाम होतो आणि त्यांना या बदलांविषयी किती माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी मुंबईतील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रश्नावली देण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना हवामान बदल कशामुळे होतो, त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात किंवा वातावरणाच्या रक्षणासाठी आपण काय करू शकतो, याची स्पष्ट कल्पना नव्हती.

‘क्राय’ संस्थेने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत २८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक प्रश्न कोणते, हवामान बदल म्हणजे काय, त्याची कारणे आणि उपाय काय असू शकतात अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नमंजुषेतून गोळा झालेल्या माहितीनुसार ७४ टक्के मुली तर २६ टक्के मुले होती. बहुतांश सर्व विद्यार्थी ९वी व १०चे विद्यार्थी होते. बहुतेक विद्यार्थ्यांना हवामान बदल म्हणजे काय ते माहित होते. त्यातील ८९.७ टक्के मुलांना ती गंभीर समस्या असल्याचे वाटत होते.

यातील ५१.३ टक्के विद्यार्थ्यांनी हवामान बदलाचा संबंध अचूकपणे हरितगृह वायूंशी जोडला तर, ७.७ टक्के विद्यार्थ्यांची उत्तरे स्पष्ट नव्हती किंवा चुकीची होती. प्रदूषणाच्या बाबतीत विचार केला असता हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करणारे ५६.४ टक्के विद्यार्थी असले तरी हवा प्रदूषण (७१.८ टक्के) आणि पाणी प्रदूषण (६४.१ टक्के) या बाबी विद्यार्थ्यांना अधिक त्रासदायक वाटत होत्या. यातून स्पष्ट होते की हवामान बदल हा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रश्न नसून पर्यावरणातील व्यापक संकटाचा एक भाग आहे, असे त्यांचे निरीक्षण आहे.

माहिती मिळवण्याचे प्रमुख माध्यम इंटरनेट आणि टेलिव्हिजन (५३.८ टक्के) ठरले असून, शाळेतून माहिती मिळाली असल्याचे अवघ्या ३२.३ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे. त्यामुळे हवामान बदलासंदर्भात शालेय पातळीवर अधिक प्रभावी शिक्षण आणि माध्यमांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज यातून अधोरेखित झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तूंचा वापर, वाहनांचा वापर कमी करणे, पण केवळ १५.४ टक्के विद्यार्थीच इतरांशी यावर संवाद साधतात, यावरून हा विषय मित्रपरिवारात किंवा सहकाऱ्यांमध्ये पुरेसा चर्चिला जात नाही, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान बदलाविषयी विद्यार्थ्यांचा समज वेगवेगळा होता. यामधील २३.१ टक्के विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली, १७.९ टक्के जणांना आशा वाटत होती, तर १५.४ टक्के विद्यार्थ्यांनी उदासीनता दर्शवली. मात्र, एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. साधारण ४१ टक्के विद्यार्थ्यांना काही कृती केल्यावर चांगले वाटते पण १५.४ टक्के विद्यार्थ्यांनी एकटे पडल्यासारखे वाटते, असे सांगितले. त्यामुळे अशा विषयांवर संवाद साधणाऱ्यांची गरज अधोरेखित होते आहे.