मुनगंटीवार यांचा दावा; जयंत पाटील यांना प्रत्युत्तर वस्तू आणि सेवा कर हा कायदा केवळ एक राष्ट्र- एक कर एवढय़ापुरता मर्यादित नसून राज्याच्या आर्थिक विकासास चालना देणारा हा कायदा आहे. जीएसटी हे गोरगरीब जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करणारे आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक शक्ती देणारे विधेयक असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी विधानसभेत केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे जंयत पाटील यांनी जीएसटीवर तीन तास केलेले भाषण हे प्रख्यात कॉमेडियन कपिल शर्मा याच्या उरात धडकी भरविणारा ‘कॉमेडी शो’ होता अशा शब्दात अर्थमंत्र्यांनी पाटील यांच्या भाषणाची खिल्ली उडविली. विधानसभेत आज वस्तू आणि सेवा यांच्या राज्यांतर्गत होणाऱ्या पुरवठय़ावर कर आकारणी करण्यासंदर्भातील विधेयकावर दिवसभर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. जीएसटी विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झाले, त्यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. विधानसभेत मात्र विरोधकांनी जीएसटीमुळे राज्याची आíथक स्थिती कशी असेल याबाबत व्यक्त केलेली चिंता, नाराजी दुर्दैवी असून राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने जीएसटीमुळे त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, तर उलट फायदाच होईल, असा दावा अर्थमंत्र्यांनी केला. राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले त्यावेळी कृषी क्षेत्राचा विकासदर नकारात्मक होता. राज्यावर कर्जाचा डोंगर होता. मात्र गेल्या दोन वर्षांत सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे विकासदर ५.८ वरून ९.४ टक्केपर्यंत वाढला. कृषी क्षेत्राचा विकासदर, दरडोई उत्पन्नात वाढ झाली. राजकोषीय तूट १.८ वरून १.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. एकंदरीत राज्यातील आर्थिक स्थिती उत्तम असूनही विरोधक निर्माण करीत असलेली भीती अनाठायी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी यावेळी माजी अर्थमंत्री राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. पाटील हे आर्थिक विषयाचे जाणकार असल्यामुळे जीएसटीबाबत काही मौलिक सूचना करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या तीन तास १६ मिनिटांच्या भाषणाचा सभागृहावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांचे भाषण म्हणजे ‘दि जयंत पाटील कॉमेडी शो’ होता अशा शब्दात त्यांनी पाटील यांच्या भाषणाची खिल्ली उडविली. पाटील यांचा माफीनामा जयंत पाटील यांनी शनिवारी जीएसटी विधेयकावर बोलताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आज सत्ताधारी पक्षाच्या महिला सदस्यांनी आक्षेप घेत माफीची मागणी केली. त्यावर आपण कोणत्याही हेतूने अपशब्द बोललो नसल्याचे सांगत अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाटील यांचे ते वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून काढून टाकले.