मुंबई : तांत्रिक बिघाडानंतर सोमवारपासून नव्याने सुरू झालेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान पहिल्याच दिवशी तब्बल २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील ८३ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून प्रवेश शुल्कही भरले. मात्र, सोमवारी सकाळी ११ वाजता प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही तास संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्जच भरता येत नव्हता. तसेच, त्यानंतरही वारंवार संकेतस्थळ हँग होत होते. परिणामी, विद्यार्थी व पालकांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या.

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोमवारी सुरळीत सुरू होईल या अपेक्षेने अनेक विद्यार्थी व पालकांनी सकाळी ११ वाजता अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. मात्र ‘विद्यार्थ्यांसाठी नोंदणी’ हा पर्यायच संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने विद्यार्थांना नोंदणी करताच येत नव्हती. जवळपास एक ते दीड तास हीच स्थिती होती. त्यानंतर, संकेतस्थळ सुरळीत सुरू झाले आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतरही नोंदणी करताना विद्यार्य्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

अर्ज भरण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागत होता. अर्जातील पहिला टप्पा ऑनलाइन भरल्यानंतर पुढील टप्प्यासाठी वेळ लागत होता. शुल्क भरण्यासाठी वारंवार अडचण येत होती. त्याचप्रमाणे प्रवेश अर्जातील भाग दोन भरताना महाविद्यालयांची नावे संकेतस्थळावर दिसत नव्हती. त्यामुळे, अकरावी प्रवेशाच्या नोंदणीचा पहिला दिवस हा विद्यार्थी व पालकांसाठी त्रासदायकच ठरला.

मुंबईतून ३७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकरावी प्रवेशासाठी २ लाख लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यात मुंबईतील ३७ हजार २५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील १६ हजार २६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले, तर १३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला टप्पा भरला व तीन हजार एक विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा दुसरा टप्पा भरला. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी मुंबईतून सर्वाधिक ३७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्या खालोखाल ठाण्यातून २६ हजार ५८६, पुण्यातून २५ हजार ३९४, पालघरमधून १० हजार ६५३, अहिल्यानगरमधून ७ हजार ७९७ आणि नाशिकमधून ७ हजार ८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गडचिरोलीमधून सर्वात कमी ५१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.