Bharat Jain Rich Beggar in Mumbai : मुंबई शहरात देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात. मात्र, याच शहरात देशातला श्रीमंत भिकारी देखील राहतो. भरत जैन असं या श्रीमंत भिकाऱ्याचं नाव असून दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान व आसपासच्या भागात तो भीक मागतो. येथील रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या लोकांकडे तो भीक मागतो. भीक मागून तो दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये मिळवतो. यातून तो महिन्याला सरासरी ७५ हजार रुपये जमवतो. मुंबई व आसपासच्या शहरांमधील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मुंबईकरांना दिवसाचे १२-१२ तास (आठ ते नऊ तास ऑफिस व दोन ते तीन तास प्रवास) कष्ट करूनही इतका पगार मिळत नाही.

भरत जैन हा भीक मागून मिळवलेले पैसे वाट्टेल तसे खर्च करत नाही किंवा त्याची उधळपट्टी करत नाही. खूप विचार व अभ्यास करून गुंतवणूक करतो. सध्या मुंबईत त्याच्या मालकीचे १.४ कोटी रुपयांचे दोन फ्लॅट्स आहेत. ठाण्यात त्याच्या मालकीचं एक मोठं दुकान आहे. तो या दुकानाचं दर महिन्याला ३० हजार रुपये इतकं भाडं घेतो. त्याच्या मालकीचं अजून एक दुकान असून त्याचं कुटुंब त्या दुकानातून स्टेशनरीचा व्यवसाय करत आहे. त्याची मुलं एका मोठ्या खासगी शाळेत शिकतात. इतकी मोठी संपत्ती मिळवल्यानंतरही भरत जैनने भीक मागणं बंद केलेलं नाही. तो दररोज भीक मागण्याचं काम करतो.

दानधर्माचा फायदा

भरत जैनची गोष्ट आपल्याला भारतातील दानधर्माकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहायला भाग पाडते. बऱ्याच जणांना वाटतं की काही जण जगण्यासाठी, दोन वेळेला जेवायला मिळावं यासाठी भीक मागतात. परंतु, ही बाब सर्व भिकाऱ्यांच्या बाबतीत खरी नाहीये. मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये भिकाऱ्यांनी भीक मागून मोठी माया जमवल्याच्या बातम्या अधून मधून वाचायला मिळतात. पाकिस्तानमधील शेकडो लोक दरवर्षी भीक मागण्यासाठी सौदी अरबला जातात. तिथल्या मक्का व मदिना या पवित्र धार्मिक स्थळांच्या आसपास भीक मागून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरत जैन कसा बनला श्रीमंत भिकारी?

भरत जैन हा काही जगण्यासाठी, दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी भीक मागत नाही. तो भीक मागण्याकडे पैसे जमवण्याचा स्त्रोत म्हणून पाहतो. तसेच भीक मागून जमवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवतो. अनेकजण त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे, पाप-पुण्याचा विचार करून भीक देतात. त्याचा भरत जैनसारख्या लोकांना फायदा होतो. तसेच ही माया जमवत अताना भरत जैनने कुठलाही कायदा मोडलेला नाही. त्याने फक्त व्यवस्था कशी काम करते ते समजून घेतलं आणि भीक मागण्याला व्यवसाय बनवलं, लोकांच्या सहानुभूतीला पैसै जमवण्याचं साधन बनवलं. या व्यवसायातून जमलेले पैसे त्याने गुंतवले आणि त्यातून तो कोट्यधीश झाला.