“आपला देश करोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये”  असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. एक प्रकारे हे वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजपा नेत्यांचे कानच टोचले आहेत. “एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे.” असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“सध्या देश करोनाच्या संकटाशी लढतोय. हे संकट हे देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. या संकटात राजकारण करणं गैर आहे. राष्ट्रकारण आणि विकास यांना महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक संवेदनशील नेत्याने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे” असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं. आपत्तीचं रुपांतर इष्टापत्तीत कसं करता येईल याचा विचार आपला देश करतो आहे. त्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहेत असंही गडकरींनी म्हटलं आहे. मुंबई पुण्यातली स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तिथे कदाचित सगळं काही सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. तरीही महाराष्ट्रातल्या ज्या भागांमध्ये रुग्ण नाहीत तिथे हळूहळू उद्योग आणि इतर व्यवहार सुरु करता येऊ शकतील असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

करोनाची स्थिती ही गंभीर आहे. मात्र आपण करोनाचा सामना नेटाने करतो आहोत. आपल्या देशाने बरंच नियंत्रण मिळवलं आहे. मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, कामगारांच्या निवाऱ्याची आणि अन्नाची व्यवस्था करणं हे नियम पाळून उद्योग, कंपन्या सुरु केल्या तर चालणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.